Skip to main content

लोकांचा नाथ एकनाथ!

महाराष्ट्र राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची पत्रकार परिषद नुकतीच पार पडली. गेल्या दोन दिवसापासून एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री व्हावेत अशा मागणीच्या बातम्या सतत प्रसिद्ध होत होत्या. या बातम्यांच्या पार्श्वभूमीवरच काळजीवाहू मुख्यमंत्र्यांनी एक मोठी घोषणा केली. 

मुख्यमंत्री पदाबाबत मोदी आणि अमित शहा आणि भाजपाचे केंद्रीय नेतृत्व जो निर्णय घेईल तो आम्हाला मान्य असेल हे त्यांनी जाहीर करून टाकले. गेल्या दोन वर्षांत केंद्राने जे सहकार्य केले आणि जो विश्वास दाखवला त्याचे त्यांनी आभार देखील मानले. एक प्रकारे मुख्यमंत्री पदावरचा दावा ते सोडताहेत असे चित्र यामुळे निर्माण झाले.

भाजपाच्या मतदारांच्या मध्ये यामुळे साहजिकच एक आनंदाचे वातावरण निर्माण झाले आणि एकनाथ शिंदे यांच्याबद्दल एक सॉफ्ट कॉर्नर निर्माण झाला. 

पण, मुख्यमंत्र्यांचे शब्द आणि देहबोली पाहिली की हे लक्षात येते की ते आपला मुख्यमंत्री पदाबाबतचा दावा अधिक घट्ट करताहेत. 

आपला नेमका मतदार कोण, त्याचे मोदींवरचे प्रेम, आपली तळागाळातला, कष्टाळू नेता म्हणून असलेली प्रतिमा, आपल्याला जातीचं असलेलं भक्कम पाठबळ या सगळ्या गोष्टी त्यातून पुन्हा एकदा अधोरेखित झाल्या. 

ते दावा सोडत असल्याचं जरी दाखवत होते तरी, एकप्रकारे त्यांनी स्वतःचं endorsement या पदासाठी केलं. सध्या असलेल्या तथाकथित गोंधळाच्या परिस्थितीत महायुतीतल्या तीन पक्षांपैकी एका पक्षाचा प्रमुख माध्यमांसमोर म्हणजेच जनतेसमोर येतो आणि सढळहस्ते, दिलदारपणे निर्णय घेण्याची स्वायत्तता भाजपाच्या नेतृत्वाला बहाल करतो तेव्हा तो माणूस एका दगडात अनेक पक्षी मारत असतो आणि आपला दावा बळकट करत असतो. "हार कर जितने वाले को बाजीगर कहते हैं" हे शिंदे यातून अधोरेखित करीत आहेत. 

१३२ स्वतःचे आणि अपक्ष आमदार मिळून जवळपास एकहाती सत्ता असलेल्या भाजपानी ही निवडणूक जिंकून जी एकप्रकारे कोंडी शिंदे आणि पवार यांची केली होती त्यात आपण कच्चे खेळाडू नाही हे शिंदे यांनी त्यांच्या आजच्या देहबोलीतून दाखवले आहे. 

आपले ५८ आमदार घेऊन जर आपण विरोधी पक्षात बसलो तर विरोधाची सगळी स्पेस उद्धव ठाकरे यांना बहाल केल्या सारखे होईल पण, म्हणून सत्तेत भाजपा बरोबर फक्त junior partner म्हणून न राहता आपल्या नावाला आणि नेतृत्वाला देखील वजन आहे आणि आपण "महायुती"चे म्हणजेच पक्षीय राजकारणाच्या पलीकडे जाऊन महायुतीच्या मतदारांचं नेतृत्व करू शकतो हे त्यांनी दाखवून दिले. 

एकप्रकारे, भाजपाचे नेतृत्व जे भरपूर जागा जिंकल्यामुळे थोडे निर्धास्त झाले होते त्यांना गोंधळात टाकणारी आजची त्यांची पत्रकार परिषद होती. शिवाय, उध्दव ठाकरे यांच्यासारखे आपण रडगाणे गाणारे नेते नाही हे सुद्धा त्यांनी या निमित्ताने दाखवून दिले. 

महाराष्ट्राच्या राजकारणाच्या पटावर एक नवं नेतृत्व आज खऱ्या अर्थानं निर्माण झालं आहे.



Comments

  1. देवाशिष उत्तम लिहिलेस. एकनाथ शिंदेने मुख्यमंत्री पदासाठी प्रयत्न करून बघितला पण नंतर लक्षात आले असेल की यांच्या विरोधात जाऊन आपल्याला काहीही मिळणार नाही आणि आपण देखील दुसरा उद्धव ठाकरे ठरू. आधी मिळालेले मुख्यमंत्री पद म्हणजे एक तात्पुरती योजना होती आणि भविष्यात मोठे बहुमत मिळाल्यावर भाजपचे मुख्यमंत्री अर्थातच देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार हे निश्चित होते. युतीला मिळालेले यश यामध्ये भाजपचा मोठा वाटा आहे हे निश्चित आणि भाजपच्या विजया मागे कोणती शक्ती आहे हे सगळ्यांनाच ठाऊक आहे. हिंदुत्वाच राजकारण करून चुकीची स्टेप घेणे हे भविष्यासाठी त्यांना घातकच ठरले असते.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

नियतीचा क्रूर खेळ आणि रंगलेला कलगीतुरा

राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे बुधवार दि. २८ जानेवारी ला निधन झाले. स्वाभाविकच, राजकीय मतं विसरून लोकांनी या घटनेबाबत हळहळ व्यक्त केली. माध्यमांच्या समोर सतत येणाऱ्या सुप्रिया सुळे, रोहित पवार यांना पाहिले असता अशी शंका येत होती की आता पवार कुटुंबातीलच कोणीतरी म्हणजे मुख्यत्वे सुप्रिया सुळे याच दोन्ही राष्ट्रवादी पक्षांची धुरा सांभाळतील. सुप्रिया सुळे यांच्या राष्ट्रवादी पक्षातल्या काही नेत्यांनी अशी विधानं देखील केली की, दोन्ही पक्ष एकत्र यावेत अशी अजितदादांची इच्छा होती. या सर्व घटनांना आता एक दोन दिवस उलटून गेलेत आणि आता सुनेत्रा पवार या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार अशी बातमी आली.  दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांनी काल रात्री या विषयाच्या संदर्भात एक प्रतिक्रिया दिली. देवेंद्र फडणवीस हे तोलून मापून बोलणारे आहेत त्यामुळे त्यांचं बोलणं नेहमीच लक्षवेधक असतं. ते म्हणाले, महाराष्ट्र सरकार म्हणून आणि भारतीय जनता पक्ष म्हणून आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पूर्णपणे पाठीशी उभे राहू. "राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष" असा स्पष्ट उल्लेख त्यांनी आपल्या बोलण्यात केला. माझी रा...

कधी बहर कधी शिशिर

 डिसेंबर २०२४ मधली घटना आहे. महाराष्ट्राच्या नव्या सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार नागपुरातल्या राजभवनाच्या हिरवळीवर पार पडला होता. पण, या नव्या मंत्रिमंडळात गेल्या वीस वर्षांपासून हमखास असलेले एक नाव मात्र नव्हते.  दुसऱ्या दिवशी या मंत्रिमंडळात वगळल्या गेलेल्या नेत्याने पत्रकारांशी बोलताना तीव्र नाराजी, दुःख आणि आपली खदखद व्यक्त केली. "जहाँ नहीं चैना, वहाॅं नहीं रहना" असं हा नेता बोलला.  आतापर्यंत आपल्या लक्षात आलंच असेल हा नेता कोण. कालांतराने म्हणजेच ५-६ महिन्यानंतर भुजबळ पुन्हा एकदा मंत्री झाले. हे सगळं आता आठवण्याचं कारण म्हणजे अजितदादा पवार यांच्या निधनानंतर घडलेल्या घटना आहेत.  अजितदादांच्या निधनानंतर मुख्यमंत्र्यांना तातडीने जे शिष्टमंडळ भेटलं त्यात भुजबळ देखील होते. प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, धनंजय मुंडे या अजित पवारांच्या मर्जीतल्या शिलेदारांसोबत भुजबळ देखील दिसले. विधिमंडळ गटनेत्याची निवड कधी होईल वगैरे पत्रकारांना माहिती देखील भुजबळांनी दिली.  वर्षभरापूर्वी पक्ष सोडण्याची भाषा करणारे भुजबळ अजितदादांच्या मृत्यूनंतर आघाडीच्या नेत्यांपैकी एक दिसत होते. सत्त...

रमेश प्रभू, खिशातले राजीनामे आणि महिला आरक्षण विधेयक

१६ ते १८ एप्रिल दरम्यान संसदेचे विशेष अधिवेशन बोलवण्यात आले होते, ज्यामध्ये महिला आरक्षण विधेयकाची चर्चा झाली. विधेयक पारित व्हायला दोन तृतीयांश बहुमताची आवश्यकता होती, जे अर्थातच सरकारकडे नसल्यामुळे विधेयक पारित झाले नाही. या सर्व घटनांचा, पूर्वी घडलेल्या घटनांच्या आधारे धांडोळा घेण्याचा मी प्रयत्न करणार आहे. बंगालच्या निवडणुकांपूर्वी मुद्दाम मोदींनी हे विधेयक संसदेत आणले आणि हाणून पडू दिले जेणेकरून बंगालच्या विधानसभा निवडणुकीत त्याचा फायदा त्यांना उचलता येईल असा कयास राजकीय पंडितांकडून वर्तवला जात आहे. एक प्रकारे महिला आरक्षण विधेयकावर मते मिळतात की नाही हे बंगालच्या निवडणुकांमधून भारतीय जनता पक्षाला चाचपून बघायचे आहे असे विश्लेषकांचे मत आहे.  हे घटनाचक्र बघितले असता १९८७ मध्ये झालेल्या विलेपार्ले येथील विधानसभेच्या पोटनिवडणुकीची आठवण येते. या निवडणुकीत सर्वप्रथम बाळासाहेब ठाकरे यांनी "गर्व से कहो हम हिंदू है" अशी घोषणा दिली होती. हिंदुत्वाच्या मुद्द्यावर मते मिळतात की नाही हे बाळासाहेबांना चाचपून बघायचे होते आणि त्यासाठीच त्यांनी विलेपार्ले येथील पोटनिवडणुकीवर त्याचा प्रय...