ते २०१० साल होतं. माझी बारावीची परीक्षा नुकतीच संपली होती आणि दरवर्षीप्रमाणे संघाचं तृतीय वर्ष सुरू झालं होतं. प्रबंधक म्हणून जाशील का? अशी शाखेत विचारणा झाली. मी हो म्हणून सांगितलं. नागपूर महानगरात आमचा भाग सोमलवाडा. आमच्या भागाकडे त्यावर्षी बौद्धिक विभाग होता. २-४ दिवसांनी मी रेशीमबागेत दाखल झालो. मला सोडायला माझ्या शाखेचे मुख्यशिक्षक , कार्यवाह म्हणजे रोहीत भालेराव आणि सारंग मास्तर आले होते. ते दोघेही काहीच दिवसांनी द्वितीय वर्षाला जाणार होते. रेशीमबागेत पोहोचलो तर स्मृती भवनाच्या जवळच वर्गाचे पालक अधिकारी आणि तेव्हाचे अखिल भारतीय बौद्धिक प्रमुख मा. भागैयाजी भेटले. पांढरी बंडी, पांढरी लुंगी, डोक्याला रुमाल बांधलेला, तळपत्या उन्हात चमकणारा गौरवर्ण, तेजस्वी चेहरा आणि कपाळाला लावलेलं आडवं गंध/भस्म. अर्ध्या विजारीतला मी त्यांच्या पुढे उभा होतो. माझा परिचय त्यांनी करून घेतला. बौद्धिक विभागात प्रबंधक आहे असं कळल्यावर गमतीनी म्हणाले, " हमारे अधिकारी आ गये". वर्ग सुरू व्हायला दोन दिवस अवकाश होता पण वर्गाची पूर्वतयारी भरपूर होती. समय सारिणी (time table) प्रत्येक कक्षात जाऊन लावण...