बेडेकर ..... बेडेकर काय लिहून ठेवलंत हो तुम्ही !!!! ही ... नव्हे , नव्हे हीच प्रतिक्रिया तुमची सुद्धा येईल जर तुम्ही रणांगण वाचायला घेतली तर . लेखक हा एक विचारक असतो. कथा, कादंबरी, नाटक, कविता या वेगवेगळ्या देहांचा वापर करून तो आपला विचार मांडत असतो. त्या देहांचा त्याला वापर करता येतो म्हणून तो केवळ विचारवंत न राहता कलावंत होतो. रणांगण ही कादंबरी म्हणजे मराठीतला मैलाचा दगड. ऑगस्ट आणि सप्टेंबर १९३९ या काळात म्हणजेच दुसरे महायुद्ध उंबरठ्यावर असताना ही त्याच विषयाचा आधार घेऊन लिहिलेली कादंबरी . त्याच्यामुळे ही समयोचित कलाकृती आहे . ज्या घटना आज आपल्याला ऐतिहासिक वाटतात त्या काळाचा लेखक स्वतःच साक्षीदार असल्यामुळे त्या घटनांचा उपयोग लेखक कादंबरी मध्ये सुगरणीच्या कौशल्याने करून घेतो . माणूस , त्याचा स्वार्थ , त्याच्या भावना , त्याच्या गरजा , त्याच्या अपरिहार्यता , प्रेम , सूड , निर्व्याजता या सर्व विषयांच्या भोवती कादंबरी फिरते . विशिष्ट दुर्गुणांसाठी एखाद्या समाजाला संपूर्ण दोषी धरावं का ...