एखाद्या ठिकाणी आपण का फिरायला जातो? तर, ती जागा "अतिशय unique, अतिशय वेगळी" असते म्हणून. आधी हम्पी ही जागा नेमकी काय आहे हे आपण समजून घेऊ. हम्पी म्हणजेच पंपा हे शहर विजयनगर च्या साम्राज्याची राजधानी होती. विजयनगरचं साम्राज्य जवळपास २५० वर्षं होतं. आता विचार करा, की अडीचशे वर्ष एखाद्या साम्राज्याची राजधानी असलेलं शहर किती भव्य आणि किती सुंदर वसवलं गेलं असेल. महाराष्ट्रात रायगडावर महाराजांचा महाल, राणीवसा, प्रधानांचे वाडे, टांकसाळ या सगळ्या गोष्टी दिसतात पण, हम्पी हे अख्खे राजधानी चे शहर पाचशे वर्षांपूर्वी आराखडा बनवून वसवलेलं असल्यामुळे हे पाहण्याचा आनंद काहीतरी वेगळाच आहे. तर, मागच्या भागात लिहिल्या प्रमाणे दुसऱ्या दिवस अखेर आमचा प्रवास हम्पी च्या दिशेनी सुरू झाला. हम्पी च्या वेशीवरच्या मुख्य चौकात पोहोचलो तेव्हा तिथे काही गाईड मंडळी गप्पा मारत बसली होती. त्यातल्या एकाला निश्चित केले आणि तो आम्हाला तुंगभद्रेच्या काठावर घेऊन गेला. गोलाकार होडीत बसून आम्ही नदीच्या पात्रात उतरलो. अवती भवती सर्वत्र दगडांचे डोंगर होते. नावेतून थोडं पुढे तो आम्हाला सूर्य मंदिराकडे घेऊन गेला. काही ...