Skip to main content

सफर कर्नाटकची: भाग दुसरा

मागच्या लेखात म्हटल्या प्रमाणे आम्ही सोलापूर मार्गे कर्नाटक ला जायला निघालो. दौऱ्याच्या पहिल्या रात्री आम्ही बदामी येथे मुक्कामाला थांबणार होतो. जाता जाता वाटेत विजापूर लागतं. विजापूर बद्दल आपण सर्वांनीच शाळेत शिवाजी महाराजांच्या इतिहासात वाचलेलं असतं. त्यामुळे तिथे काही बघता येईल का असा विचार केला. विजापूर मध्ये गोल गुंबज बराच प्रसिद्ध आहे त्यामुळे तिथे जायचा निर्णय घेतला. 

गोल गुंबज म्हणजे मुहम्मद आदिलशहाची कबर. आता या शाही समाधी चं बांधकाम त्यानी स्वतः च्या हयातीत सुरू केलं. खरी समाधी तळघरात तर, दाखवायची समाधी मुख्य मंडपात. समाधी ची जागा प्रचंड भव्य आहे. एकूण नऊ मजली इमारत आहे. नवव्या मजल्यावर गुमट आहे. गुमटाच्या एका बाजूला हळु आवाजात बोलले तरी दुसऱ्या बाजूला १८० अंशावर ऐकू येते. त्याच जागेवर एक लहानसे संग्रहालय पण आहे. पुण्याहून निघाल्यावर साधारण सात तासात आम्ही या जागी पोहोचलो. राष्ट्रीय महामार्गाच्या लगत हे शहर असल्यामुळे कुठल्याही अडचणी शिवाय इथे पोहोचलो. विजापूर मध्ये अन्य जागा बघण्यासारख्या आहेत पण, आमच्याकडे वेळ कमी असल्यामुळे आम्ही ही एकच जागा बघितली.

एखाद दोन तासात ही जागा बघून थोडंफार ताजंतवानं होऊन आमचा प्रवास पुन्हा सुरू झाला.

एकदोन तासाचा प्रवास करून आम्ही संध्याकाळ च्या वेळेला बदामी येथे पोहोचलो. बदामी हे तसं फार लहान गाव आहे. जास्तीत जास्त पन्नास हजार लोक या गावात रहात असतील. कर्नाटक सरकार च्या पर्यटन मंत्रालयाच्या हॉटेल मध्येच आमचा मुक्काम असणार होता. 

संध्याकाळी साडेसहा सात च्या सुमारास आम्ही येथे पोहोचलो. एकूण अकरा तासाचा प्रवास होता. विजापूर ला थांबलो नसतो तर एखाद दीड तास कमी लागला असता. संध्याकाळ च्या वेळेस इथे केवळ एकाच जागेवर जाऊ शकतो ते म्हणजे बनशंकरी मंदिर. 

बनशंकरी म्हणजे आपल्याकडची शाकंभरी. आजूबाजूच्या गावात दुष्काळ पडला त्यावेळी देवी प्रकट होऊन तिनी आजूबाजूच्या जमिनी वर भाज्या पिकवल्या अशी आख्यायिका आहे. ही देवी सिंहावर आरूढ आहे. मंदिर जुन्या पद्धतीचं पण, बऱ्यापैकी हिंदुस्तानात असतात तशाच पद्धतीचं हे मंदिर होतं. तात्पर्य म्हणजे, दाक्षिणात्य पद्धतीचं मंदीर नव्हतं. सुंदर मंदिर आहे. मंदिराच्या बाहेर भलामोठा हौद आहे. संध्याकाळच्या वेळेस देवळाच्या बाहेर एका उडूप्याचे हॉटेल होते तिथे इडली दोसा वगैरे खाणे झाले. सांबार - चटणी यांची चव अर्थातच लाजवाब होती.

दुसऱ्या दिवशी आम्ही सकाळी आम्ही बदामी च्या लेण्या पाहायला गेलो. दोन तीन लेण्या एकाच जागेवर आहेत. फार सुबक कोरीव आहेत. अजिंठ्याच्या भव्य लेण्या पाहून जसा विस्मय वाटतो तसं काही वाटत नसलं तरी, प्रत्येक बारीक बारीक detailing असलेल्या किल्लेवजा ठिकाणी तळ्याच्या काठावर या लेण्या आहेत. सर्व लेण्या लाल दगडात आहेत. अनेक देवतांच्या सुस्थितीत असलेल्या या लेण्या आहेत. मारुती, शेषशायी विष्णू, भगवान् महावीर यांच्या दगडात कोरलेल्या प्रतिमा आपल्याला पाहायला मिळतात.

लेण्या पाहून झाल्या की थोड्याच अंतरावर तळ्याच्या काठावर असलेल्या भूतनाथ मंदिरात गेलो. देवळाची जागा इतकी शांत, निवांत आहे की त्याला कुठलीही तोड नाही. या जागेचा अधिकाधिक आनंद उचलायचा असेल तर शनिवार रविवार सोडून या जागेवर जावे. या जागेबद्दल काहीही लिहीत नाही फक्त खाली छायाचित्र लावतो म्हणजे ही जागा काय चीझ आहे हे आपल्यालाच लक्षात येईल.

या दोनही जागा पाहून झाल्यावर हॉटेल मधून बाहेर पडून सरळ हम्पी च्या वाटेला लागलो. ऐहोळे आणि अन्य दोन तीन जागा काही पाहू शकलो नाही. 

ज्या जागेच्या कुतूहलापोटी निघालो होतो त्या जागेकडे सरते शेवटी जायला निघालो.

हम्पी हा सिनेमा पाच वर्षापूर्वी पाहिला होता तेव्हा या जागेचा परिचय झाला होता. आता नेमकं आपल्याला हंपीत काय पहायला मिळेल? भरून पावल्यासारखं होईल की पदरी अगदीच निराशा येईल अशा संमिश्र भावना अधिक कुतुहल घेऊन आम्ही निघालो. 

गाडीच्या चाकांबरोबर आमचं मन देखील हम्पी कडे धाव घ्यायला लागलं. 

(क्रमशः)

Comments

Popular posts from this blog

नियतीचा क्रूर खेळ आणि रंगलेला कलगीतुरा

राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे बुधवार दि. २८ जानेवारी ला निधन झाले. स्वाभाविकच, राजकीय मतं विसरून लोकांनी या घटनेबाबत हळहळ व्यक्त केली. माध्यमांच्या समोर सतत येणाऱ्या सुप्रिया सुळे, रोहित पवार यांना पाहिले असता अशी शंका येत होती की आता पवार कुटुंबातीलच कोणीतरी म्हणजे मुख्यत्वे सुप्रिया सुळे याच दोन्ही राष्ट्रवादी पक्षांची धुरा सांभाळतील. सुप्रिया सुळे यांच्या राष्ट्रवादी पक्षातल्या काही नेत्यांनी अशी विधानं देखील केली की, दोन्ही पक्ष एकत्र यावेत अशी अजितदादांची इच्छा होती. या सर्व घटनांना आता एक दोन दिवस उलटून गेलेत आणि आता सुनेत्रा पवार या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार अशी बातमी आली.  दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांनी काल रात्री या विषयाच्या संदर्भात एक प्रतिक्रिया दिली. देवेंद्र फडणवीस हे तोलून मापून बोलणारे आहेत त्यामुळे त्यांचं बोलणं नेहमीच लक्षवेधक असतं. ते म्हणाले, महाराष्ट्र सरकार म्हणून आणि भारतीय जनता पक्ष म्हणून आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पूर्णपणे पाठीशी उभे राहू. "राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष" असा स्पष्ट उल्लेख त्यांनी आपल्या बोलण्यात केला. माझी रा...

कधी बहर कधी शिशिर

 डिसेंबर २०२४ मधली घटना आहे. महाराष्ट्राच्या नव्या सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार नागपुरातल्या राजभवनाच्या हिरवळीवर पार पडला होता. पण, या नव्या मंत्रिमंडळात गेल्या वीस वर्षांपासून हमखास असलेले एक नाव मात्र नव्हते.  दुसऱ्या दिवशी या मंत्रिमंडळात वगळल्या गेलेल्या नेत्याने पत्रकारांशी बोलताना तीव्र नाराजी, दुःख आणि आपली खदखद व्यक्त केली. "जहाँ नहीं चैना, वहाॅं नहीं रहना" असं हा नेता बोलला.  आतापर्यंत आपल्या लक्षात आलंच असेल हा नेता कोण. कालांतराने म्हणजेच ५-६ महिन्यानंतर भुजबळ पुन्हा एकदा मंत्री झाले. हे सगळं आता आठवण्याचं कारण म्हणजे अजितदादा पवार यांच्या निधनानंतर घडलेल्या घटना आहेत.  अजितदादांच्या निधनानंतर मुख्यमंत्र्यांना तातडीने जे शिष्टमंडळ भेटलं त्यात भुजबळ देखील होते. प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, धनंजय मुंडे या अजित पवारांच्या मर्जीतल्या शिलेदारांसोबत भुजबळ देखील दिसले. विधिमंडळ गटनेत्याची निवड कधी होईल वगैरे पत्रकारांना माहिती देखील भुजबळांनी दिली.  वर्षभरापूर्वी पक्ष सोडण्याची भाषा करणारे भुजबळ अजितदादांच्या मृत्यूनंतर आघाडीच्या नेत्यांपैकी एक दिसत होते. सत्त...

रमेश प्रभू, खिशातले राजीनामे आणि महिला आरक्षण विधेयक

१६ ते १८ एप्रिल दरम्यान संसदेचे विशेष अधिवेशन बोलवण्यात आले होते, ज्यामध्ये महिला आरक्षण विधेयकाची चर्चा झाली. विधेयक पारित व्हायला दोन तृतीयांश बहुमताची आवश्यकता होती, जे अर्थातच सरकारकडे नसल्यामुळे विधेयक पारित झाले नाही. या सर्व घटनांचा, पूर्वी घडलेल्या घटनांच्या आधारे धांडोळा घेण्याचा मी प्रयत्न करणार आहे. बंगालच्या निवडणुकांपूर्वी मुद्दाम मोदींनी हे विधेयक संसदेत आणले आणि हाणून पडू दिले जेणेकरून बंगालच्या विधानसभा निवडणुकीत त्याचा फायदा त्यांना उचलता येईल असा कयास राजकीय पंडितांकडून वर्तवला जात आहे. एक प्रकारे महिला आरक्षण विधेयकावर मते मिळतात की नाही हे बंगालच्या निवडणुकांमधून भारतीय जनता पक्षाला चाचपून बघायचे आहे असे विश्लेषकांचे मत आहे.  हे घटनाचक्र बघितले असता १९८७ मध्ये झालेल्या विलेपार्ले येथील विधानसभेच्या पोटनिवडणुकीची आठवण येते. या निवडणुकीत सर्वप्रथम बाळासाहेब ठाकरे यांनी "गर्व से कहो हम हिंदू है" अशी घोषणा दिली होती. हिंदुत्वाच्या मुद्द्यावर मते मिळतात की नाही हे बाळासाहेबांना चाचपून बघायचे होते आणि त्यासाठीच त्यांनी विलेपार्ले येथील पोटनिवडणुकीवर त्याचा प्रय...