डिसेंबर २०२४ मधली घटना आहे. महाराष्ट्राच्या नव्या सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार नागपुरातल्या राजभवनाच्या हिरवळीवर पार पडला होता. पण, या नव्या मंत्रिमंडळात गेल्या वीस वर्षांपासून हमखास असलेले एक नाव मात्र नव्हते.
दुसऱ्या दिवशी या मंत्रिमंडळात वगळल्या गेलेल्या नेत्याने पत्रकारांशी बोलताना तीव्र नाराजी, दुःख आणि आपली खदखद व्यक्त केली. "जहाँ नहीं चैना, वहाॅं नहीं रहना" असं हा नेता बोलला.
आतापर्यंत आपल्या लक्षात आलंच असेल हा नेता कोण.
कालांतराने म्हणजेच ५-६ महिन्यानंतर भुजबळ पुन्हा एकदा मंत्री झाले.
हे सगळं आता आठवण्याचं कारण म्हणजे अजितदादा पवार यांच्या निधनानंतर घडलेल्या घटना आहेत.
अजितदादांच्या निधनानंतर मुख्यमंत्र्यांना तातडीने जे शिष्टमंडळ भेटलं त्यात भुजबळ देखील होते. प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, धनंजय मुंडे या अजित पवारांच्या मर्जीतल्या शिलेदारांसोबत भुजबळ देखील दिसले. विधिमंडळ गटनेत्याची निवड कधी होईल वगैरे पत्रकारांना माहिती देखील भुजबळांनी दिली.
वर्षभरापूर्वी पक्ष सोडण्याची भाषा करणारे भुजबळ अजितदादांच्या मृत्यूनंतर आघाडीच्या नेत्यांपैकी एक दिसत होते.
सत्ताधारी पक्षाच्या प्रमुख नेत्याला युतीतला पक्ष म्हणून जे शिष्टमंडळ भेटायला जातं त्यात पक्षाच्या पहिल्या फळीतले नेते असतात. यावरून, वयाच्या ७९व्या वर्षी देखील आपण महत्त्वाचे नेते आहोत आणि राजकारणात अजूनही आपले महत्व टिकवून आहोत हेच भुजबळांनी दाखवून दिले.
अर्थात्, राजकारणात बंद दाराआड काय होतं हे लोकांना कधीच कळत नाही. त्यामुळे, मधल्या एक दीड वर्षांत अजितदादांच्या गोटात असं काय घडलं की आता छगन भुजबळ थेट पुढच्या रांगेत बसलेले दिसले? की, त्यांना मंत्रिमंडळातून वगळणं आणि त्यांनी नाराजी व्यक्त करणं यात सुद्धा काही डावपेच होता?
सामान्य माणसाला यातलं कधीच काही कळत नाही. केवळ, बाहेर दिसणाऱ्या घटना दिसतात. बाहेर दिसणारी घटना ही हिमनगाच्या टोकाप्रमाणे असते; आत खूप काही घडत असतं पण, बाहेर फारच थोडं येत असतं.
असे सर्व विषय पत्रकारांनी लोकांपुढे मांडले पाहिजेत. पण, असे थेट "ठळक बातमी" न देणारे विषय हे पत्रकारांकडून हाताळले जात नाहीत हे दुर्दैव आहे.
सामान्य माणूस मात्र "यत्र यत्र धूमस्तत्र तत्र वह्निः" अर्थात्, जिथे धूर आहे तिथे अर्थातच अग्नी असला पाहिजे या न्यायाने बाहेर दिसणाऱ्या घटनांच्या आधारे आपला न्यायनिवाडा करत असतो.
राजकीय नेत्यांच्या आयुष्यात कधी चांगले दिवस असतात तर, कधी वाईट दिवस असतात. छगन भुजबळ यांच्या बाबतीतले हे निरीक्षण कुठल्याच माध्यमांकडून पुढे आलेले दिसले नाही म्हणून हा लेखनप्रपंच.
पुढच्या साडेतीन चार वर्षांत राज्याच्या राजकारणात कोणाच्या आयुष्यात "शिशिर" आहे आणि कोणाच्या आयुष्यात "बहर" आहे हे येणारा काळच सांगेल.

Comments
Post a Comment