एखाद्या ठिकाणी आपण का फिरायला जातो? तर, ती जागा "अतिशय unique, अतिशय वेगळी" असते म्हणून.
आधी हम्पी ही जागा नेमकी काय आहे हे आपण समजून घेऊ. हम्पी म्हणजेच पंपा हे शहर विजयनगर च्या साम्राज्याची राजधानी होती. विजयनगरचं साम्राज्य जवळपास २५० वर्षं होतं. आता विचार करा, की अडीचशे वर्ष एखाद्या साम्राज्याची राजधानी असलेलं शहर किती भव्य आणि किती सुंदर वसवलं गेलं असेल.
महाराष्ट्रात रायगडावर महाराजांचा महाल, राणीवसा, प्रधानांचे वाडे, टांकसाळ या सगळ्या गोष्टी दिसतात पण, हम्पी हे अख्खे राजधानी चे शहर पाचशे वर्षांपूर्वी आराखडा बनवून वसवलेलं असल्यामुळे हे पाहण्याचा आनंद काहीतरी वेगळाच आहे.
तर, मागच्या भागात लिहिल्या प्रमाणे दुसऱ्या दिवस अखेर आमचा प्रवास हम्पी च्या दिशेनी सुरू झाला. हम्पी च्या वेशीवरच्या मुख्य चौकात पोहोचलो तेव्हा तिथे काही गाईड मंडळी गप्पा मारत बसली होती. त्यातल्या एकाला निश्चित केले आणि तो आम्हाला तुंगभद्रेच्या काठावर घेऊन गेला. गोलाकार होडीत बसून आम्ही नदीच्या पात्रात उतरलो. अवती भवती सर्वत्र दगडांचे डोंगर होते. नावेतून थोडं पुढे तो आम्हाला सूर्य मंदिराकडे घेऊन गेला. काही अजूनही नैसर्गिक पडझडीनी भग्न झालेल्या वास्तू होत्या. होडीतून परत येताना सूर्य अस्ताला चालला होता, नदी प्रवाही पण संथ गतीनी वाहत होती. सूर्याचं तेज कमी झाल्यामुळे वातावरण पण थंड झाले होते. त्यामुळे अशा वातावरणात तिथे पाण्याच्या मधोमध फारच छान वाटत होते.
या नौकाविहारा बरोबरच त्या दिवशीची आमची भटकंती संपली.
दुसऱ्या दिवशी सकाळी सर्वात आधी आम्ही विठ्ठल मंदिरात गेलो. विठ्ठल मंदिरात विठ्ठल नाहीच. देवाची मूर्तीच नाही. आक्रमणात मूर्ती कोणीतरी हलवल्या. पण, इतक्या वेगवेगळया प्रकारच्या इमारती असलेलं मंदिर भारतात फारच कमी ठिकाणी सापडेल. इथे आघात केल्यावर संगीताचे स्वर ऐकू येतील अशा तऱ्हेने बांधलेले खांब आहेत. कोणार्कच्या सूर्यमंदिरात जसा रथ आहे तसा दगडाचा रथ आहे. अतिशय सुबक, प्रशस्त आणि वेगळीच पण सुन्दर अशी ही वास्तू आहे. विजयनगरच्या साम्राज्याची एकेकाळी ओळख असलेली ही वास्तू आहे. ही वास्तू पाहिल्यावर हे साम्राज्य किती भव्य, दिव्य, श्रीमंत आणि उदात्त असेल याची कल्पना येते.
संपूर्ण शहरात अठरा - वीस फुटाच्या दगडाच्या भव्य मूर्ती दिसतात. विशेषतः गणपती, लक्ष्मी नृसिंह आणि इथे असलेले शिवलिंग विशेषत्वाने पाहण्यासारखे आहेत.
महानवमी साठी बांधलेल्या उत्सवाच्या जागी सिंहासनाची भव्य जागा, तिथे पाणी वाहून नेण्याची व्यवस्था, मोठा हौद या वास्तू आहेत. राणीवसा, भव्य सुबक अशी हत्तीशाळा, जलक्रीडा करण्यासाठी बांधलेले भव्य हौद हे पाहिले की पाचशे वर्षापूर्वी सुस्थितीत असलेले एक मोठे शहर कसे होते याची पूर्ण कल्पना येते. अशा जागा आज भारतात खूप कमी असाव्यात, म्हणून हम्पी एकदा पहायलाच हवे. या शहरात अजूनही उत्खनन सुरू आहे. म्हटलं तर हम्पी एका दिवसांत पण फिरता येऊ शकतं आणि म्हटलं तर १५ दिवस सुद्धा कमी पडतील. आपल्याला असलेला वेळ आणि रुची यावर हे अवलंबून आहे.

.jpeg)
.jpeg)


Comments
Post a Comment