Skip to main content

संदेश रामलल्लाचा

श्रीराम जन्मभूमी इथे उभ्या राहिलेल्या मंदिराला आज इंग्रजी तारखेप्रमाणे एक वर्ष पूर्ण झालं. तिथी प्रमाणे काही दिवसांपूर्वीच एक वर्ष पूर्ण झालं. वर्षभरापूर्वी अनेक जण त्या क्षणाबद्दल भरभरून व्यक्त झाले. मी सुद्धा झालो. पण, एका वर्षापूर्वी जे गृह-संपर्क अभियान राबवल्या गेलं त्याबद्दल आज व्यक्त व्हावंसं वाटतं.

घरोघरी जाऊन मंदिराच्या निमंत्रणाची अक्षत् कार्यकर्त्यांनी द्यावी ही कल्पनाच अतिशय जबरदस्त, हृद्य आणि भावनिक करणारी होती. आपल्या घरी अयोध्येच्या रामाच्या दर्शनाला तुम्ही या असं निमंत्रण घेऊन कोणीतरी आलंय ही कल्पनाच अंगावर रोमांच उभी करणारी होती आणि स्वाभाविकपणेच कोणीही आपल्या अश्रूंचा बांध थांबवू इच्छितही नव्हता. 

श्रीराम जन्मभूमीचा संघर्षाचा काळ तर मी डोळ्यांनी पाहिला नाही, कारण ८० च्या दशकात माझा जन्मच झाला नव्हता. बाबरी ढाचा पडल्यानंतर काही आंदोलनं झाली पण, त्याची धग कमी झालेली होती कारण, प्रकरण न्यायप्रविष्ठ होतं. Archaelogical survey of India नी २०००-०१ च्या सुमारास सर्वेक्षण करुन त्या जागेवरचे मंदिराचे पुरावे दिले होते त्यावेळी सर्वांमध्ये एक आनंदाची लहर उसळल्याचं स्मरतं. 

पण, आता मंदिर उभं राहिलंय तर प्रत्येकाचा त्यात सहभाग असला पाहिजे यासाठी अक्षत् वितरणाची योजना राबवली गेली. इतकी जबरदस्त आयडिया माझ्या आयुष्यात मी कधी पाहिली नाही. एखादा मोठा management, advertising क्षेत्रातला माणूस सुद्धा थक्क होईल अशी ही कल्पना होतीच. 

कल्पना राबवण्यात अर्थात् संघ परिवारातले लोक निष्णात असतात यात काही शंकाच नाही. संघात वस्ती - रचना नावाचा प्रकार असतोच त्याच्याच माध्यमातून काम केल्या गेलं. अनेक मंदिरं, सत्संग मंडळं, सामान्य माणसं यात जोडल्या गेली आणि हा - हा म्हणता अभियान पूर्ण झालं. 

आमच्या पिढीतले अनेक जण ज्यांना रामजन्मभूमीसाठी संघर्ष करण्याचं भाग्य लाभलं नाही त्यांना या कार्यात सहभागी होऊन, "रामकाज करिबे को आतुर" चा अनुभव मिळाला. 

आणि मग २२ जानेवारी ला मा. पंतप्रधानांच्या हस्ते जेव्हा मंदिराचं उद्घाटन झालं तो क्षण तर काय वर्णावा. कोणीच आपल्या अश्रूंचा बांध रोकू शकलं नाही. या काळात जन्म मिळाला याचे परमेश्वराला धन्यवाद द्यावेत असा तो क्षण होता.

त्यादिवशी अयोध्या सुद्धा, 

बुडूनी जाय नगर सर्व नृत्य-गायनी 

सूर रंग ताल त्यात मग्न मेदिनी 

मोत्यांचा चुर नभी भरून राहिला 

राम जन्मला ग सखी, राम जन्मला 

अश्शीच सजली होती. 

पण, अयोध्या त्यावेळी सजली अनेकांच्या रक्तपातातून, संघर्षातून, घामातून. रामलल्ला च्या चऱ्येतून मला तर हाच भाव दिसतो की, तुम्ही संघर्ष करा तरच माझं बळ मी तुमच्या मागे उभं करीन. आपल्या राष्ट्रजीवनाकडे तो तटस्थपणे पाहत उभा आहे असंच वाटतं. 

असो. 

आपलं राष्ट्र जिवंत आहे. इथली संस्कृती, इथला समाज कोणीही कितीही आक्रमणं केली तरी नष्ट करू शकत नाही हेच पुन्हा एकदा सिद्ध झालं. 

हे सिद्ध झालं असं आपण म्हणतो तर खरं, पण भारतीय उपखंडातून आपली संस्कृती पाकिस्तान आणि बांगलादेश ही नावं घेऊन लोपली हे सुद्धा आपल्याला लक्षात घ्यावं लागेल आणि आपली संस्कृती, सभ्यता टिकली तरच जगाचा समतोल राहील हे सुद्धा लक्षात घ्यावं लागेल.

रामलल्लाची प्राण प्रतिष्ठापना तर केली पण, अजून बरंच काम बाकी आहे हेच रामलल्ला आजच्या दिवशी आपल्याला सांगतो आहे. 

श्रीरामचंद्रार्पणमस्तु



Comments

  1. खूप सुंदर लिखाण. प्राणप्रतिष्ठा झाली तो गेल्या वर्षीचा काळ आणि त्यानंतरचे हे वर्ष असे डोळ्यांसमोर पुन्हा जिवंत झाले.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

नियतीचा क्रूर खेळ आणि रंगलेला कलगीतुरा

राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे बुधवार दि. २८ जानेवारी ला निधन झाले. स्वाभाविकच, राजकीय मतं विसरून लोकांनी या घटनेबाबत हळहळ व्यक्त केली. माध्यमांच्या समोर सतत येणाऱ्या सुप्रिया सुळे, रोहित पवार यांना पाहिले असता अशी शंका येत होती की आता पवार कुटुंबातीलच कोणीतरी म्हणजे मुख्यत्वे सुप्रिया सुळे याच दोन्ही राष्ट्रवादी पक्षांची धुरा सांभाळतील. सुप्रिया सुळे यांच्या राष्ट्रवादी पक्षातल्या काही नेत्यांनी अशी विधानं देखील केली की, दोन्ही पक्ष एकत्र यावेत अशी अजितदादांची इच्छा होती. या सर्व घटनांना आता एक दोन दिवस उलटून गेलेत आणि आता सुनेत्रा पवार या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार अशी बातमी आली.  दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांनी काल रात्री या विषयाच्या संदर्भात एक प्रतिक्रिया दिली. देवेंद्र फडणवीस हे तोलून मापून बोलणारे आहेत त्यामुळे त्यांचं बोलणं नेहमीच लक्षवेधक असतं. ते म्हणाले, महाराष्ट्र सरकार म्हणून आणि भारतीय जनता पक्ष म्हणून आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पूर्णपणे पाठीशी उभे राहू. "राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष" असा स्पष्ट उल्लेख त्यांनी आपल्या बोलण्यात केला. माझी रा...

कधी बहर कधी शिशिर

 डिसेंबर २०२४ मधली घटना आहे. महाराष्ट्राच्या नव्या सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार नागपुरातल्या राजभवनाच्या हिरवळीवर पार पडला होता. पण, या नव्या मंत्रिमंडळात गेल्या वीस वर्षांपासून हमखास असलेले एक नाव मात्र नव्हते.  दुसऱ्या दिवशी या मंत्रिमंडळात वगळल्या गेलेल्या नेत्याने पत्रकारांशी बोलताना तीव्र नाराजी, दुःख आणि आपली खदखद व्यक्त केली. "जहाँ नहीं चैना, वहाॅं नहीं रहना" असं हा नेता बोलला.  आतापर्यंत आपल्या लक्षात आलंच असेल हा नेता कोण. कालांतराने म्हणजेच ५-६ महिन्यानंतर भुजबळ पुन्हा एकदा मंत्री झाले. हे सगळं आता आठवण्याचं कारण म्हणजे अजितदादा पवार यांच्या निधनानंतर घडलेल्या घटना आहेत.  अजितदादांच्या निधनानंतर मुख्यमंत्र्यांना तातडीने जे शिष्टमंडळ भेटलं त्यात भुजबळ देखील होते. प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, धनंजय मुंडे या अजित पवारांच्या मर्जीतल्या शिलेदारांसोबत भुजबळ देखील दिसले. विधिमंडळ गटनेत्याची निवड कधी होईल वगैरे पत्रकारांना माहिती देखील भुजबळांनी दिली.  वर्षभरापूर्वी पक्ष सोडण्याची भाषा करणारे भुजबळ अजितदादांच्या मृत्यूनंतर आघाडीच्या नेत्यांपैकी एक दिसत होते. सत्त...

रमेश प्रभू, खिशातले राजीनामे आणि महिला आरक्षण विधेयक

१६ ते १८ एप्रिल दरम्यान संसदेचे विशेष अधिवेशन बोलवण्यात आले होते, ज्यामध्ये महिला आरक्षण विधेयकाची चर्चा झाली. विधेयक पारित व्हायला दोन तृतीयांश बहुमताची आवश्यकता होती, जे अर्थातच सरकारकडे नसल्यामुळे विधेयक पारित झाले नाही. या सर्व घटनांचा, पूर्वी घडलेल्या घटनांच्या आधारे धांडोळा घेण्याचा मी प्रयत्न करणार आहे. बंगालच्या निवडणुकांपूर्वी मुद्दाम मोदींनी हे विधेयक संसदेत आणले आणि हाणून पडू दिले जेणेकरून बंगालच्या विधानसभा निवडणुकीत त्याचा फायदा त्यांना उचलता येईल असा कयास राजकीय पंडितांकडून वर्तवला जात आहे. एक प्रकारे महिला आरक्षण विधेयकावर मते मिळतात की नाही हे बंगालच्या निवडणुकांमधून भारतीय जनता पक्षाला चाचपून बघायचे आहे असे विश्लेषकांचे मत आहे.  हे घटनाचक्र बघितले असता १९८७ मध्ये झालेल्या विलेपार्ले येथील विधानसभेच्या पोटनिवडणुकीची आठवण येते. या निवडणुकीत सर्वप्रथम बाळासाहेब ठाकरे यांनी "गर्व से कहो हम हिंदू है" अशी घोषणा दिली होती. हिंदुत्वाच्या मुद्द्यावर मते मिळतात की नाही हे बाळासाहेबांना चाचपून बघायचे होते आणि त्यासाठीच त्यांनी विलेपार्ले येथील पोटनिवडणुकीवर त्याचा प्रय...