सोमवार ची सकाळ झाली. नेहमीप्रमाणे पंत कचेरीत जाण्यासाठी तयार झाले. माईंनी तयार केलेला डबा घेतला आणि सायकलीला टांग मारून ऑफिसच्या दिशेनी निघाले. आज नव्या भागातून पहिल्यांदाच कचेरीकडे त्यांच्या सायकलनी धाव घेतली होती कारण, बांधलेल्या नव्या घरातून पहिल्यांदाच ते कार्यालयात जात होते.
पूर्वीचं घर कार्यालयापासून फारच जवळ होतं. तिथे त्यांचे काही जुने सोबती - मित्र राहत होते. तिथे अनेक स्नेहबंध निर्माण झाले होते पण, स्वतःचे घर बांधल्यामुळे ते सर्व जग सोडून ते नव्या घरात आले होते.
खरंतर, नवे घर तसे लहानच होते. मुलं, पत्नी त्यांचे वाढलेले व्याप या सर्वांचा विचार करता जागा फारच लहान होती आणि गावाच्या बऱ्यापैकी बाहेरच. पण, रुपया - रुपया गोळा करुन त्यांचे स्वतःचे घर झाले होते आणि अशा नव्या घरातून आज ते पहिल्यांदा कचेरीत निघाले होते.
त्यांची सायकल वर्धा रस्त्यावरून पुढे जात जात अजनी चौकाला लागली आणि पंतांच्या मनात विचारांचा ओघ सुरू झाला. मोठा मुलगा तसा नोकरीच्या वयाचा झाला होता आणि एका ठिकाणी नोकरीला लागला सुद्धा होता; त्याला अजून चांगली, स्थिर नोकरी लागेल का, मग पुढे त्याचे लग्न लावले पाहिजे त्याची तजवीज केली पाहिजे या विचारात ते गुंतले. तसं पाहिलं तर ते अतिशय हळवे होते पण, कठोर, बलवान झाल्याशिवाय जगात आपली धडगत नाही या अनुभवामुळे तोच संस्कार आपण पुढच्या पिढीवर करायला पाहिजे या भावनेतून ते अत्यंत करारी वागत असत.
अजनी ओलांडून सायकल गोरक्षण जवळ आली आणि त्यांचं मन तिथे लागणाऱ्या संघशाखेच्या आठवणीत रमलं. लहानपणी मोरोपंत पिंगळ्यांबरोबर घालवलेले अनेक क्षण आठवले. क्षणभर मनात विचार आला - आज जुन्या घरासमोरून जावे. त्याप्रमाणे त्यांची सायकल उजवीकडे वळली आणि आपल्या जुन्या भाड्याच्या घरासमोर क्षणभर थबकली. आज आपलं स्वतःचं घर झालं पण, या वास्तूचे आपल्यावर अनंत उपकार आहेत असं वाटून त्यांना गलबलून आलं. आपण बांधलेलं घर पाहायला आपली आई असती तर.... या विचारात त्यांचं मन गुंतलं. आपल्या आईनी अठराविश्वे दारिद्र्यात आपल्याला वाढवलं. अक्षरशः आश्रीतासारखं आपलं कुटुंब असताना त्याला सावरून धरलं या सगळ्याचं त्यांना स्मरण झालं. आज ती आपलं घर पाहायला असायला हवी होती असं त्यांना अतिशय मनापासून वाटत होतं. माणूस कितीही मोठा झाला; साहेब झाला तरी, आईशी त्याचं असलेलं अत्यंत हळवं नातं अबाधित राहतं. त्यांच्या घाऱ्या - गोऱ्या चेहऱ्यावर दोन अश्रुबिंदू चमकले. या सर्व भावनांच्या कल्लोळात आपण सदर ओलांडून आपल्या कचेरीजवळ पोहोचलो आहोत याचं त्यांना भान राहिलं नाही.
आता मध्यमवयात आल्यामुळे आणि आयुष्यभर अविश्रांत पायपीट केल्यामुळे त्यांचे पाय सुद्धा दुखत असत. पायाचं दुखणं त्यांनी त्यांनी थोडासा पाय हलवून कमी करायचा प्रयत्न केला. बघता बघता कचेरी जवळ आली.
डोळ्यातले अश्रूबिंदू आणि पायाचा ठणका सावरीत पंत कचेरीच्या आवारात शिरले. साहेब आले म्हणून चौकीदार सुद्धा सावरला.
आणि पंत कचेरीच्या दारात आल्याबरोबर म्हणाला, "गुड मॉर्निंग, sir".
पंत सुद्धा त्याला आपल्या कणखर, खणखणीत, करारी आवाजात म्हणाले, "हॅलो! गुड मॉर्निंग, प्रकाश"
पंतांनी कचेरीत प्रवेश केला. जगात अत्यंत करारी म्हणून वावरणाऱ्या एका व्यक्तीचा स्वतःशी असलेला भावनिक संवाद संपला आणि बाहेरून काटेरी पण आतून फणसाप्रमाणे गोड असणाऱ्या एका जीवानी वास्तवाच्या जगात पुन्हा प्रवेश केला.
© देवाशीष विनोद सहस्रबुद्धे

खूप छान, अप्रतिम लिखाण.
ReplyDeleteमस्त !! थोडी अजून मोठी गोष्ट चालली असती
ReplyDelete