Skip to main content

स्वरगंधर्व सुधीर फडके: माझी निरीक्षणे आणि मते

चरित्रपट पाहताना एक क्षण आपल्याला असं वाटतं की, पडद्यावर तो नट नाहीच तर तो नट ज्याची भूमिका साकारतोय ती व्यक्तीच समोर आहे की काय?  

'83 पाहताना समोर रणवीर सिंह नाहीच तर कपिल देवच आहे असा भास अनेक वेळेस होतो. तो आनंद अत्यंत सुखावह असतो.

चरित्रपट पाहताना निदान एकदातरी असा अनुभव यायला हवा. दुर्दैवाने हा चित्रपट पाहताना असं कधीच वाटलं नाही की समोर सुनील बर्वे नाही तर बाबुजीच आहेत. चित्रपटातल्या काही क्षणांचे फोटो बघितले की वाटतं पण, एरव्ही वाटत नाही. 

चित्रपट फ्लॅशबॅक पद्धतीत चित्रित केलाय. अशोक रानडे यांना बाबुजी मुलाखत देतायत आणि मग मागच्या काळाची दृश्ये घेतली आहेत. तसा फॉर्म घेतला नसता तर फार बरं झालं असतं असं वाटतं. चित्रपट सुरूवातीला वेग घेत नाही असं वाटतं. चित्रपटाची सुरुवात अडखळत होतेय असं वाटतं. त्यात मध्येच एका reality show मध्ये श्रीधर फडके परिक्षक आहेत आणि ते बाबुजींची माहिती सांगतात आहेत हा सीन येतो. कॅमेऱ्याला बघून थोडे nervous झालेले श्रीधर फडके आपल्याला बघायला मिळतात.

त्यानंतर, डॉक्टर हेडगेवार यांच्या निधनाची बातमी बाबुजींचे मित्र त्यांना पत्राद्वारे कळवतात आणि पत्र वाचताच मागून बाबुजींचं डॉक्टर हेडगेवार यांच्यावर गायलेलं "लो श्रद्धांजली राष्ट्रपुरुष" हे गाणं वाजतं. खरंतर, हे गाणं बॅकग्राऊंड ला घेण्यासाठी हा सीन लिहीलाय का काय असा प्रश्न पडायला लागतो. 

वास्तविक, डॉक्टरांच्या निधनानी तत्कालीन संघ स्वयंसेवकांवर शोककळा पसरली यात काहीच शंका नाही. पण, बाबूजींच्या जीवनात त्यांच्या निधनानी काही मोठा बदल झाला असं काही नाही त्यामुळे या प्रसंगाची काही आवश्यकता नव्हती असे वाटते. "तोच चंद्रमा नभात" गाण्याच्या बाबतीत पण तसेच काहीतरी irrelavant संवाद घेतले आहेत असं वाटतं.

बाबूजींवर रस्त्यावर राहण्याचा प्रसंग येतो त्यावेळेस मात्र, मागे दाखवलेले "तुला पाहते रे तुला पाहते जरी आंधळी मी तुला पाहते" हे गाणं फारच चपखल घेतले आहे आणि त्यातून दिग्दर्शकाची सौंदर्यदृष्टी दिसते. 

गीत रामायणाला २५ वर्षे पूर्ण झाली त्या कार्यक्रमात अटल बिहारी वाजपेयी येतात आणि बाबूजींच्या जीवनाचा गौरवपूर्ण उल्लेख करतात असा प्रसंग आहे. चित्रपटाच्या नायकाबद्दल एखाद्या दुसऱ्या पात्राची "Testimony" या पलीकडे या प्रसंगात काहीही नाही. याच्यातून बाबूजींच्या आयुष्यातली कुठलीही मोठी घटना, प्रसंग काहीही अधोरेखित होताना दिसत नाही. 

तळजाई च्या संघ शिबिराचे देखील तेच. बाबूजी त्यात सहभागी झाले त्यांनी स्वयंसेवकांकडून गीत बसवून घेतले आणि मंचावरून सादर केले असा प्रसंग आहे. बाबुजी संघ स्वयंसेवक होते हे पूर्वार्धात अतिशय व्यवस्थित प्रकारे दाखवले होते. शिवाय संघ स्वयंसेवकांना बरोबर घेऊन दादरा नगर हवेली मुक्ती संग्रामातला त्यांचा सहभाग देखील आधीच व्यवस्थित दाखवला होता असं असताना पुन्हा त्यांना शिबिरात गेलेलं दाखवणं, गीत म्हंटलेलं दाखवणं यातून दिग्दर्शकानी काय साधलं कुणास ठाऊक. 

बाबूजींचा "सावरकर दर्शन प्रतिष्ठान", "ग्राहक पंचायत" या संस्थांच्या स्थापनेतला सहभाग, मोहन रानडे यांच्या सुटकेसाठी त्यांनी केलेले प्रयत्न, दलित महिलेवर अत्याचार झाल्यानंतर त्यांनी मुंबईत केलेलं उपोषण हे प्रसंग दाखवता आले असते.

पाडगावकर, यशवंत देव, राम मराठे, जगदीश खेबुडकर यांच्या बरोबरचे त्यांचे काम, भरपूर अनुभवी असल्यामुळे चित्रसृष्टीत त्यांना असलेला मान या पैकी काहीच दाखवलेलं नाही. 

चित्रपटाचा पूर्वार्ध मात्र अप्रतिम केलेला आहे; सुरुवातीची धीमी गती सोडल्यास. त्याच बरोबर आणखी दोन प्रसंग फारच सुंदर घेतले आहेत ते म्हणजे, गीत रामायणाचं पहिलं गाणं चित्रित होतं त्याच्या आधीचं सगळं नाट्य आणि त्या नंतर गाण्याचं ध्वनीमुद्रण होताना काचेबाहेर भावूक झालेले माडगूळकर हा प्रसंग अप्रतिम. 

दुसरा सुंदर प्रसंग म्हणजे बाबूजी सांगतात की आता उत्तर आयुष्याचं ध्येय म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकरांवर जनतेच्या सहभागातून चित्रपट काढणार. एवढा मोठा संगीतकार गायक लोकांच्या घरोघरी जाऊन निधी गोळा करतोय हा प्रसंग मनाला प्रचंड भिडतो आणि त्यातून बाबूजींचं भव्य दिव्य व्यक्तिमत्त्व देखील दिसतं.

ललिता बाई फडके यांची मृण्मयी देशपांडे हिने केलेली भूमिका तसेच, ग. दि. मांची भूमिका सागर तळाशीकर यांनी अप्रतिम पणे केली आहे.

पण, एकंदरीतच, चित्रपटात सुधारणेला भरपूर वाव होता.

पण, बाबूजींसारख्या प्रखर राष्ट्रवादी, संघ स्वयंसेवक, स्वतःची विचारधारा प्रतिकूल काळात देखील समाजातल्या अभिजन वर्गात जपणाऱ्या एका थोर व्यक्तीवर योगेश देशपांडे यांनी चित्रपट काढण्याचे धारिष्ट्य डावी ecosystem चित्रपटसृष्टीत चांगली जम बसवून असताना केले हे ही नसे थोडके. त्या बद्दल योगेश देशपांडे यांचे अभिनंदन!

----लेखन सीमा----

✍️ देवाशीष विनोद सहस्रबुद्धे



Comments

  1. लेखक देवाशीष विनोद सहस्रबुद्धे यांचे लेखन अत्यंत समर्पक आणि सखोल आहे. त्यांनी चित्रपटाच्या सकारात्मक आणि नकारात्मक पैलूंची सखोल चर्चा केली आहे. चित्रपटाचे काही प्रसंग अत्यंत सुंदर आणि प्रभावी आहेत, तर काही प्रसंग अनावश्यक आणि असंबद्ध वाटतात हे त्यांनी स्पष्टपणे मांडले आहे. विशेषतः, बाबूजींच्या जीवनातील महत्त्वाच्या घटकांची अभाव दिसतो हे लेखकाने बरोबर निदर्शनास आणले आहे. एकंदरीत, चित्रपट अधिक प्रभावी होऊ शकला असता, परंतु चित्रपट तयार करण्याचे धारिष्ट्य हेही अभिनंदनीय आहे. लेखनाची शैली प्रवाही आणि विश्लेषणात्मक आहे, जी वाचकाला प्रभावित करते.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

नियतीचा क्रूर खेळ आणि रंगलेला कलगीतुरा

राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे बुधवार दि. २८ जानेवारी ला निधन झाले. स्वाभाविकच, राजकीय मतं विसरून लोकांनी या घटनेबाबत हळहळ व्यक्त केली. माध्यमांच्या समोर सतत येणाऱ्या सुप्रिया सुळे, रोहित पवार यांना पाहिले असता अशी शंका येत होती की आता पवार कुटुंबातीलच कोणीतरी म्हणजे मुख्यत्वे सुप्रिया सुळे याच दोन्ही राष्ट्रवादी पक्षांची धुरा सांभाळतील. सुप्रिया सुळे यांच्या राष्ट्रवादी पक्षातल्या काही नेत्यांनी अशी विधानं देखील केली की, दोन्ही पक्ष एकत्र यावेत अशी अजितदादांची इच्छा होती. या सर्व घटनांना आता एक दोन दिवस उलटून गेलेत आणि आता सुनेत्रा पवार या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार अशी बातमी आली.  दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांनी काल रात्री या विषयाच्या संदर्भात एक प्रतिक्रिया दिली. देवेंद्र फडणवीस हे तोलून मापून बोलणारे आहेत त्यामुळे त्यांचं बोलणं नेहमीच लक्षवेधक असतं. ते म्हणाले, महाराष्ट्र सरकार म्हणून आणि भारतीय जनता पक्ष म्हणून आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पूर्णपणे पाठीशी उभे राहू. "राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष" असा स्पष्ट उल्लेख त्यांनी आपल्या बोलण्यात केला. माझी रा...

कधी बहर कधी शिशिर

 डिसेंबर २०२४ मधली घटना आहे. महाराष्ट्राच्या नव्या सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार नागपुरातल्या राजभवनाच्या हिरवळीवर पार पडला होता. पण, या नव्या मंत्रिमंडळात गेल्या वीस वर्षांपासून हमखास असलेले एक नाव मात्र नव्हते.  दुसऱ्या दिवशी या मंत्रिमंडळात वगळल्या गेलेल्या नेत्याने पत्रकारांशी बोलताना तीव्र नाराजी, दुःख आणि आपली खदखद व्यक्त केली. "जहाँ नहीं चैना, वहाॅं नहीं रहना" असं हा नेता बोलला.  आतापर्यंत आपल्या लक्षात आलंच असेल हा नेता कोण. कालांतराने म्हणजेच ५-६ महिन्यानंतर भुजबळ पुन्हा एकदा मंत्री झाले. हे सगळं आता आठवण्याचं कारण म्हणजे अजितदादा पवार यांच्या निधनानंतर घडलेल्या घटना आहेत.  अजितदादांच्या निधनानंतर मुख्यमंत्र्यांना तातडीने जे शिष्टमंडळ भेटलं त्यात भुजबळ देखील होते. प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, धनंजय मुंडे या अजित पवारांच्या मर्जीतल्या शिलेदारांसोबत भुजबळ देखील दिसले. विधिमंडळ गटनेत्याची निवड कधी होईल वगैरे पत्रकारांना माहिती देखील भुजबळांनी दिली.  वर्षभरापूर्वी पक्ष सोडण्याची भाषा करणारे भुजबळ अजितदादांच्या मृत्यूनंतर आघाडीच्या नेत्यांपैकी एक दिसत होते. सत्त...

रमेश प्रभू, खिशातले राजीनामे आणि महिला आरक्षण विधेयक

१६ ते १८ एप्रिल दरम्यान संसदेचे विशेष अधिवेशन बोलवण्यात आले होते, ज्यामध्ये महिला आरक्षण विधेयकाची चर्चा झाली. विधेयक पारित व्हायला दोन तृतीयांश बहुमताची आवश्यकता होती, जे अर्थातच सरकारकडे नसल्यामुळे विधेयक पारित झाले नाही. या सर्व घटनांचा, पूर्वी घडलेल्या घटनांच्या आधारे धांडोळा घेण्याचा मी प्रयत्न करणार आहे. बंगालच्या निवडणुकांपूर्वी मुद्दाम मोदींनी हे विधेयक संसदेत आणले आणि हाणून पडू दिले जेणेकरून बंगालच्या विधानसभा निवडणुकीत त्याचा फायदा त्यांना उचलता येईल असा कयास राजकीय पंडितांकडून वर्तवला जात आहे. एक प्रकारे महिला आरक्षण विधेयकावर मते मिळतात की नाही हे बंगालच्या निवडणुकांमधून भारतीय जनता पक्षाला चाचपून बघायचे आहे असे विश्लेषकांचे मत आहे.  हे घटनाचक्र बघितले असता १९८७ मध्ये झालेल्या विलेपार्ले येथील विधानसभेच्या पोटनिवडणुकीची आठवण येते. या निवडणुकीत सर्वप्रथम बाळासाहेब ठाकरे यांनी "गर्व से कहो हम हिंदू है" अशी घोषणा दिली होती. हिंदुत्वाच्या मुद्द्यावर मते मिळतात की नाही हे बाळासाहेबांना चाचपून बघायचे होते आणि त्यासाठीच त्यांनी विलेपार्ले येथील पोटनिवडणुकीवर त्याचा प्रय...