Skip to main content

गाथा "भारत मंडपम्" ची

अबब! केवढी ती भलीमोट्ठी जागा. ती नाट्यगृहे, बैठकांच्या खोल्या, मैदानं, कारंजी!!! 

सांगतो. सांगतो. सर्वांची तपशीलवार माहिती सांगतो. 

तर, आता गेल्या आठवड्यात उद्घाटन झालेल्या "भारत मंडपम्" ची माहिती सांगतो. त्या आधी याची गरज काय होती ते सांगतो.

जगभरात मोठ्या व्यावसायिक बैठका, प्रदर्शनी, चर्चासत्र यांचे आयोजन करायचे आणि त्यातून पैसा कमवायचा असा एक मोठा व्यवसाय चालतो. त्याला म्हणतात, MICE economy (Meetings, Incentives, Conferences, Exhibitions). 

आता ही अर्थव्यवस्था, किती मोठी आहे? तर, अंदाजे ७०० अब्ज डॉलर्स (५६ लाख कोटी रुपये) एवढी.

ICCA (International Congress and Convention Association) च्या आकडेवारी नुसार भारत या उद्योगात जगात ३७ व्या क्रमांकावर आहे आणि जागतिक उत्पन्नाच्या केवळ १% उत्पन्न (revenue) भारत कमावतो. भारताचे उद्दिष्ट या क्षेत्रात पुढच्या पाच वर्षात पहिल्या २० देशांमध्ये स्थान मिळवणे हे आहे.

अमेरिका, स्पेन, इटली, जर्मनी, फ्रान्स हे या क्षेत्रातले आघाडीचे देश. 

MICE economy ला पाठबळ देण्याची कारणे?

प्रचंड आर्थिक उलाढाल आणि रोजगाराच्या संधी देणारे हे क्षेत्र आहे. पर्यटन, उपहारगृह, वाहतूक सेवा (transport) या सर्व क्षेत्रांना चालना देणारे हे क्षेत्र आहे. MICE इकॉनॉमी ला या "भारत मंडपम्" मुळे निर्विवाद पणे चालना मिळेल.

२६ जुलै २०२३ रोजी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंटरनॅशनल एक्झीबिशन कम कनव्हेनशन सेंटर (IECC) अर्थात् "भारत मंडपम्" चे उद्घाटन केले. जुन्या प्रगती मैदानाच्या जागेवरच हे नवे बांधकाम करण्यात आलेले आहे. 

१२३ एकर एवढ्या विस्तीर्ण परिसरात हा प्रकल्प आहे. हा प्रकल्प ITPO अर्थात् International Trade Promotion Organisation चा आहे. ITPO ही वाणिज्य मंत्रालयाच्या अखत्यारीत येणारी संस्था आहे. प्रकल्पाचा खर्च २७०० कोटी रुपये एवढा आहे. २०१७ साली भारत सरकारने प्रगती मैदानाचे नूतनीकरण करण्याचा निर्णय घेतला. 

जुन्या प्रगती मैदानात प्रदर्शन लावण्यासाठी जागा होती. मात्र, बैठका (meeting rooms), चर्चासत्र (conference rooms) किंवा सभागृह(auditorium), amphitheatre यांच्या सारख्या सुविधा नव्हत्या. तसेच, वाहनतळ (पार्किंग) देखील बरेच लहान होते.

नव्याने बांधलेल्या "भारत मंडपम्" मध्ये बैठकीसाठी एकूण 24 कक्ष आहेत. पैकी 20 हे तळ मजल्यावर (L1) आहेत. 50, 100 आणि 200 अशा क्षमतेचे हे कक्ष आहेत.

पहिल्या मजल्यावर (L2) समिट रूम आहे आणि 600 आणि 900 असं क्षमतेची दोन सभागृहे म्हणजेच ऑडिटोरियम्स आहेत.

दुसऱ्या मजल्यावर(L3) मल्टीपर्पज हॉल ज्याची क्षमता साधारण चार हजार लोकांची आहे आणि त्याबरोबरच एखाद्या ऑडिटोरियम प्रमाणे असलेला प्लॅनरी हॉल ही दुसऱ्या मजल्याची वैशिष्ट्ये आहेत. या दोन्ही सभागृहांच्या मधोमध सरकती भिंत आहे ही भिंत सरकवल्यानंतर हे दोन्ही हॉल एकत्र करता येऊ शकतात ज्याच्यामुळे या संपूर्ण हॉलची एकूण क्षमता ही सात ते आठ हजार लोकांची होऊ शकते.

तिसऱ्या मजल्यावर(L4) ऍम्फीथिएटर आहे ज्याची क्षमता 3000 लोकांची आहे.

शिवाय, या परिसरात प्रदर्शनी लावण्यासाठी ७ सभागृहे (exhibition halls) आहेत. 

या इमारतीच्या प्रवेशद्वारावर सूर्याचे आणि त्याचे वाहन असलेल्या सात घोड्यांचे कोरीव चित्र आहे. योगासने, भारताची अंतराळ क्षेत्रातली म्हणजेच इस्रोची भरारी, पंचमहाभूते अशा विविध विषयांचा सजावटीसाठी उपयोग केला आहे. राष्ट्रीय पक्षी असलेल्या मोराचा आणि मोरपिसाचा सजावटीसाठी सर्वाधिक उपयोग केला आहे. "मोरपीस" ही मध्यवर्ती संकल्पना ठेवून सर्व सजावट करण्यात आली आहे. सभागृहांमध्ये उत्तम दर्जाचे हातमागाचे गालीचे अंथरण्यात आलेले आहेत. सजावटीसाठी लागणारे तसेच बांधकामाचे एकूण एक सामान भारतातूनच आणलेले आहे. "मेक इन इंडिया" चे हे उत्तम उदाहरण आहे. 

शिवाय, या संपूर्ण सेंटर मध्ये ५जी इंटरनेट सेवा, १०जी इंट्रानेट सेवा, सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे निरीक्षण, १६ भाषांमध्ये भाषणांचे स्वयंचलित भाषांतर करणारे सुसज्ज असे दालन, ध्वनीचित्र दाखवण्यासाठी आधुनिक तंत्राने बांधलेल्या भिंती, गरजेप्रमाणे प्रकाश कमी अधिक करण्याची स्वयंचलित यंत्रणा (सेन्सर्स), केंद्रीय वातानुकूलन यंत्रणा, उत्तम कनेक्टिव्हिटी (Data Communication network) अशा सर्व सुविधा आहेत. इमारत बाहेरून शंखाकृती दिसते. 

या अत्याधुनिक सोयींनी युक्त सेंटर साठी दिल्ली ची निवड करण्याचे कारण म्हणजे, अशा सर्व कार्यक्रमांच्या साठी सरकार, विविध उद्योगसमूह, व्यावसायिक मंडळे यांचे पाहिले प्राधान्य हे दिल्ली असते. या सर्व mice उद्योगात दिल्लीचे योगदान अन्य भारतीय शहरांच्या तुलनेत बरेच जास्त आहे.

एकंदरीतच डोळ्यांचे पारणे फिटेल असे, भारताचे वैभव सर्व जगाला दाखवेल असे, महात्मा बसवेश्वर यांच्या "अनुभव मंडपम्" च्या प्रेरणेतून ज्याचे नामाभिदान करण्यात आले असे "भारत मंडपम्" नक्कीच पाहायला हवे.

राष्ट्रीय सौर दिनांक, १४ श्रावण १९४५



Comments

  1. देवाशिष जी.... अतिशय उत्तम आणि विस्तृत वर्णन. सर्वसामान्यांच्या ज्ञानात निश्चित भर घालणारे. आतापर्यंत वाचायला वेळच मिळाला नाही. आता वाचन केले.

    ReplyDelete
  2. व्वा! किती व्यापक आणि तपशीलवार माहिती दिली आहे "भारत मंडपम्" विषयी. MICE economy मधील भारताच्या स्थानाबद्दल आणि या क्षेत्राच्या महत्वाबद्दल खूप काही शिकायला मिळाले. नव्या "भारत मंडपम्" च्या सुविधांनी निश्चितच भारताचे स्थान जागतिक पातळीवर वाढवण्यास मदत होईल. अशा अत्याधुनिक सोयीसुविधांनी युक्त केंद्रामुळे भारताची प्रतिष्ठा वाढेल हे नक्कीच. इतकी महत्त्वपूर्ण आणि सुंदर माहिती दिल्याबद्दल आभारी आहे. आपल्या लेखणीतून भारताचा उभारलेला गौरव स्पष्ट दिसतो. धन्यवाद!

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

नियतीचा क्रूर खेळ आणि रंगलेला कलगीतुरा

राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे बुधवार दि. २८ जानेवारी ला निधन झाले. स्वाभाविकच, राजकीय मतं विसरून लोकांनी या घटनेबाबत हळहळ व्यक्त केली. माध्यमांच्या समोर सतत येणाऱ्या सुप्रिया सुळे, रोहित पवार यांना पाहिले असता अशी शंका येत होती की आता पवार कुटुंबातीलच कोणीतरी म्हणजे मुख्यत्वे सुप्रिया सुळे याच दोन्ही राष्ट्रवादी पक्षांची धुरा सांभाळतील. सुप्रिया सुळे यांच्या राष्ट्रवादी पक्षातल्या काही नेत्यांनी अशी विधानं देखील केली की, दोन्ही पक्ष एकत्र यावेत अशी अजितदादांची इच्छा होती. या सर्व घटनांना आता एक दोन दिवस उलटून गेलेत आणि आता सुनेत्रा पवार या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार अशी बातमी आली.  दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांनी काल रात्री या विषयाच्या संदर्भात एक प्रतिक्रिया दिली. देवेंद्र फडणवीस हे तोलून मापून बोलणारे आहेत त्यामुळे त्यांचं बोलणं नेहमीच लक्षवेधक असतं. ते म्हणाले, महाराष्ट्र सरकार म्हणून आणि भारतीय जनता पक्ष म्हणून आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पूर्णपणे पाठीशी उभे राहू. "राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष" असा स्पष्ट उल्लेख त्यांनी आपल्या बोलण्यात केला. माझी रा...

कधी बहर कधी शिशिर

 डिसेंबर २०२४ मधली घटना आहे. महाराष्ट्राच्या नव्या सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार नागपुरातल्या राजभवनाच्या हिरवळीवर पार पडला होता. पण, या नव्या मंत्रिमंडळात गेल्या वीस वर्षांपासून हमखास असलेले एक नाव मात्र नव्हते.  दुसऱ्या दिवशी या मंत्रिमंडळात वगळल्या गेलेल्या नेत्याने पत्रकारांशी बोलताना तीव्र नाराजी, दुःख आणि आपली खदखद व्यक्त केली. "जहाँ नहीं चैना, वहाॅं नहीं रहना" असं हा नेता बोलला.  आतापर्यंत आपल्या लक्षात आलंच असेल हा नेता कोण. कालांतराने म्हणजेच ५-६ महिन्यानंतर भुजबळ पुन्हा एकदा मंत्री झाले. हे सगळं आता आठवण्याचं कारण म्हणजे अजितदादा पवार यांच्या निधनानंतर घडलेल्या घटना आहेत.  अजितदादांच्या निधनानंतर मुख्यमंत्र्यांना तातडीने जे शिष्टमंडळ भेटलं त्यात भुजबळ देखील होते. प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, धनंजय मुंडे या अजित पवारांच्या मर्जीतल्या शिलेदारांसोबत भुजबळ देखील दिसले. विधिमंडळ गटनेत्याची निवड कधी होईल वगैरे पत्रकारांना माहिती देखील भुजबळांनी दिली.  वर्षभरापूर्वी पक्ष सोडण्याची भाषा करणारे भुजबळ अजितदादांच्या मृत्यूनंतर आघाडीच्या नेत्यांपैकी एक दिसत होते. सत्त...

रमेश प्रभू, खिशातले राजीनामे आणि महिला आरक्षण विधेयक

१६ ते १८ एप्रिल दरम्यान संसदेचे विशेष अधिवेशन बोलवण्यात आले होते, ज्यामध्ये महिला आरक्षण विधेयकाची चर्चा झाली. विधेयक पारित व्हायला दोन तृतीयांश बहुमताची आवश्यकता होती, जे अर्थातच सरकारकडे नसल्यामुळे विधेयक पारित झाले नाही. या सर्व घटनांचा, पूर्वी घडलेल्या घटनांच्या आधारे धांडोळा घेण्याचा मी प्रयत्न करणार आहे. बंगालच्या निवडणुकांपूर्वी मुद्दाम मोदींनी हे विधेयक संसदेत आणले आणि हाणून पडू दिले जेणेकरून बंगालच्या विधानसभा निवडणुकीत त्याचा फायदा त्यांना उचलता येईल असा कयास राजकीय पंडितांकडून वर्तवला जात आहे. एक प्रकारे महिला आरक्षण विधेयकावर मते मिळतात की नाही हे बंगालच्या निवडणुकांमधून भारतीय जनता पक्षाला चाचपून बघायचे आहे असे विश्लेषकांचे मत आहे.  हे घटनाचक्र बघितले असता १९८७ मध्ये झालेल्या विलेपार्ले येथील विधानसभेच्या पोटनिवडणुकीची आठवण येते. या निवडणुकीत सर्वप्रथम बाळासाहेब ठाकरे यांनी "गर्व से कहो हम हिंदू है" अशी घोषणा दिली होती. हिंदुत्वाच्या मुद्द्यावर मते मिळतात की नाही हे बाळासाहेबांना चाचपून बघायचे होते आणि त्यासाठीच त्यांनी विलेपार्ले येथील पोटनिवडणुकीवर त्याचा प्रय...