काळ जसा बदलतो तशी संगीत सादर करण्याची पद्धत सुद्धा बदलत जाते.
तमाशा, भारुड, गोंधळ, संगीतनाटक या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये प्रामुख्यानी संगीत सादर केले जात असे.
गेल्या शतकाच्या सुरुवातीला चित्रपट नावाचे नवे माध्यम उपलब्ध झाले. पुढे चित्रपट केवळ पौराणिक कथांवर आधारित न राहता वर्तमान काळावर आधारलेले चित्रपट सुद्धा तयार होऊ लागले. या नव्या कथावस्तुंबरोबरच एक नवा, ताज्या दमाचा, प्रतिभाशाली संगीतकार, गायक सिनेसृष्टीला मिळाला. त्याचं नाव होतं सुधीर फडके अर्थात् बाबुजी.
बाबुजींचा स्वर कानावर पडला आणि अंगावर रोमांच उभा राहिला नाही असा माणूस महाराष्ट्रात दुर्मिळ. आजही तोच चंद्रमा नभात, सखी मंद झाल्या तारका, तुझे गीत गाण्यासाठी, धुंदी कळ्यांना धुंदी फुलांना ही आणि अशी अनेक गाणी मराठी माणसानी आपल्या हृदयाच्या कोपऱ्यामध्ये जपून ठेवली आहेत.
शास्त्रीय गायकीचा उत्तम अभ्यास, त्याचा ललित संगीतामध्ये कौशल्याने केलेला वापर, शब्द - स्वर आणि त्याचा भाव योग्य प्रकारे टिपून त्याचा गाण्यात केलेला अंतर्भाव म्हणजे बाबुजींचं गाणं.
काव्याचा भाव योग्य प्रकारे गाण्यात टिपायचा असेल तर प्रतिभेबरोबरच संगीताच्या उत्तम तालमीची सुद्धा आवश्यकता असते. बाबुजींना गायनाचार्य वामनराव पाध्यांची तालीम मिळाली होती. त्याबरोबरच बाबुजी कोल्हापूरामध्ये असताना मेळ्यात गात असत. मेळ्यामध्ये गात असतानाच गाण्यामध्ये भाव कशाप्रकारे टिपावा जेणेकरून त्याचा लोकांवर अधिकाधिक परिणाम होईल याचा अभ्यास बाबुजींनी केला. हाच अभ्यास पुढे संगीत दिग्दर्शक म्हणून बाबुजींच्या कामी आला.
गाण्यामध्ये बाबुजींनी उत्पन्न केलेला भाव ही रसिकांच्या मनाच्या अत्यंत जवळची बाब आहे. मग ते गीत रामायणातलं कुठल्याही व्यक्तिरेखेच्या तोंडी असलेलं गाणं असो, लावणी असो, भावगीत असो किंवा अभंग असो त्या प्रत्येकात त्यांनी जागवलेला भाव हा रसिकांच्या डोळ्यात पाणी आणल्याशिवाय राहत नाही. "डोळ्यांमधले आसू पुसती ओठावरले गाणे" ही मंगेश पाडगावकरांची रचना बाबुजी गायले. ती ऐकून पाडगावकर म्हणाले, आज मला माझी कविता नव्याने भेटली.
बाबुजींच्या गाण्यामधली आणखी एक अतिशय सुंदर बाब म्हणजे त्यांनी केलेला वेगवेगळ्या रागांचा वापर. "जीवलगा कधी रे येशील तू" या गाण्यात त्यांनी ४-५ वेगवेगळया रागांचा वापर केला आहे. त्यांच्या सगळ्या संगीताचा आधार हे राग संगीत आहे. त्यांना शास्त्रीय गायकच व्हायचं होतं पण घरामधल्या परिस्थितीमुळे त्यांना चित्रपट संगीताकडे वळावं लागलं. त्या शास्त्रीय संगीताच्या शिक्षणाचा उपयोग बाबुजींनी असा संगीत दिग्दर्शक म्हणून करून घेतला.
बाबुजींचा विषय निघाला की स्वाभाविकपणेच गदिमा अर्थात् गजानन दिगंबर माडगुळकरांचा उल्लेख अनिवार्य आहे. गदिमांचे शब्द आणि बाबुजींचं संगीत या समिकरणानी रसिकांवर अक्षरशः राज्य केलं. चित्रपटामध्ये कमी वेळात लोकांना सहज समजेल आणि सादर होणाऱ्या दृष्याच्या अर्थाला चपखल अशी शब्दयोजना करण्यात माडगुळकर वाकबगार होतेच; त्याला जोड म्हणून बाबुजींसारखा संगीतकार लाभला आणि पुढे घडलेला इतिहास आपल्या समोर आहेच. 'लाखाची गोष्ट', 'जगाच्या पाठीवर', 'पुढचं पाऊल', 'मुंबईचा जावई', 'सुवासिनी' अशा कित्येक चित्रपटांना या जोडीनी गीत-संगीत दिलं.
१९५५ साली पुण्याच्या आकाशवाणी केंद्रावरून या जोडीकडून एक अद्भुत कलाकृती जन्मली. तिचं नाव "गीत रामायण". प्रभु श्रीरामांच्या आयुष्यावर आधारित ही संपुर्ण गीतमाला. प्रभु श्रीरामांच्या आयुष्यातल्या प्रत्येक प्रमुख घटनेवर एक गीत याप्रमाणे ५६ गीतांचा हा संग्रह. या गीत रामायाणाला ६५ वर्षं होऊन गेली तरीही त्याची लोकप्रियता आजही कायम आहे. गीत रामायणातलं कुठलंही गाणं ऐकताना, ज्या व्यक्तिरेखेच्या तोंडी ते गाणं आहे ती व्यक्ती आपल्याशी बोलते असं वाटतं. संगीतामधला भाव म्हणजे काय तर गीत रामायण.
१९४६ साली बाबुजींची चित्रपट संगीत कारकीर्द सुरू झाली आणि १९८५-८६ पर्यंत ते संगीत दिग्दर्शक म्हणून कार्यरत होते. या संपुर्ण कारकीर्दीत १११ चित्रपटांना त्यांनी संगीत दिलं.
त्यापैकी एकवीस हिंदी चित्रपट आहेत. वास्तविक बाबुजींची संगीत कारकीर्द हिंदी चित्रपटापासूनच सुरू झाली. 'ज्योती कलश झलके', 'दिन हैं सुहाना आज पेहली तारीख हैं' ही त्यांची हिंदीतली गाणी अतिशय लोकप्रिय झाली.
पुढे स्वा. सावरकरांवर चित्रपट काढायचा म्हणून संगीत दिग्दर्शन, गायन त्यांनी कमी केलं. स्वा. सावरकरांवर लोकसहभागातून चित्रपट तयार व्हावा यासाठी ते झटले आणि आयुष्याच्या अखेरच्या टप्प्यावर त्यांचं हे स्वप्न पुर्ण झालं. या चित्रपटाचं संगीत त्यांनी केलं. या चित्रपटात त्यांनी "ने मजसी ने परत मातृभूमीला" इतकं सुंदर म्हटलं की त्याला तोड नाही.
मराठी माणसाच्या प्रत्येक सुखाच्या, दुःखाच्या, विरहाच्या, आनंदाच्या भावनेत ज्यांचं संगीत संपुर्ण सामावून गेलं अशा बाबुजींनी २९ जुलै २००२ रोजी इहलोकीची यात्रा संपवली.
"स्वर आले दुरुनी, जुळल्या सगळ्या त्या आठवणी" याप्रमाणे बाबुजी मराठी माणसाच्या कायम स्मरणात राहतील आणि नव्या काळातल्या कलावंतांना कायम प्रेरणा देत राहतील.
बाबुजींच्या स्मृतिदिनानिमित्त लिहिलेलं हे लेखनपुष्प त्यांच्या स्मृतीला समर्पित.
✍🏻 देवाशीष विनोद सहस्रबुध्दे

खुप छान देवाशिष .उत्तम लिखाण .
ReplyDeleteखूप छान
ReplyDeleteKhupach surekh!!
ReplyDeleteखूप छान लिहिलंय
ReplyDelete