साहित्य, संगीत, चित्रपट, शिल्पकला या माणसाला सौंदर्यदृष्टी देणाऱ्या आणि म्हणूनच माणूस म्हणून श्रीमंत करणाऱ्या गोष्टी आहेत.
जगभरात या सर्व क्षेत्रात नवनवे प्रयोग केल्या गेले आणि त्यातून उत्तम कलाकार आणि कलाकृती घडत गेल्या. या सगळ्या मंथनातून मग आपल्याला ब्रिटिश रंगभूमीवर benedict cumberbatch किंवा Olivia Colman सारखे नट पाहायला मिळतात.
मराठीत तर या सगळ्या प्रयोगांचा सुकाळ. संगीतनाटक मग त्यात वेगवेगळ्या रागातल्या घेतलेल्या चिजा, ती सादर करण्याची बालगंधर्वांसारख्या नटानी बदललेली पद्धत या सगळ्या गोष्टी आम्हाला अर्थातच श्रीमंत करून गेल्या.
चांगलं काय वाईट काय, त्यातून घ्यायचं काय, टाकायचं काय हे कलासृष्टीला आणि रसिकांना सुद्धा उत्तम समजतं. म्हणूनच मग एखाद्या गोष्टीची dark side जास्त दिसणाऱ्या विजय तेंडुलकरांना बरोब्बर "सिंहासन" सारख्या चित्रपटाची पटकथा लिहिण्याचं चपखल काम दिल्या जातं आणि तो प्रयोग अर्थातच यशस्वी होतो.
या सर्व गोष्टी विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात अर्थातच नोंदवल्या जात असतील. पण, या सर्व अनुभवांना, प्रयोगांना एका मालिकेच्या, मुलाखतीच्या रूपात चित्रीत करून रसिकांना आणि अभ्यासकांना दोन कार्यक्रमात खुल्या करून दिल्या गेल्या. ते दोन कार्यक्रम म्हणजे, "गंधर्वगान" आणि "रंगपंढरी".
गंधर्वगान हा कार्यक्रम अर्थातच गंधर्व गायकी म्हणजेच मुख्यत्वॆ बालगंधर्वांचं आणि अन्य काही गवयांचं गाणं या विषयावर बोलणारा तर, रंगपंढरी हा कार्यक्रम नाटकातल्या कलावंताच्या मुलाखतींचा कार्यक्रम.
आता या केवळ मनोरंजक किस्स्यांनी भरलेल्या मुलाखती आहेत का? तर, नाही. मग, या कुठल्या विद्यापीठासाठी घेतलेल्या साचेबद्ध मुलाखती/ कार्यक्रम आहेत का? तर, त्याचेही उत्तर नाही असेच आहे.
लोकांचे मन रिझेल पण, त्या बरोबरच त्यांना उत्तम रसिक बनवेल, जे अभ्यासक आहेत त्यांना देखील त्यांच्या अभ्यासात मदत करेल अशा पद्धतीनी या दोनही कार्यक्रमांची रचना करण्यात आलेली आहे.
गंधर्वगान मध्ये गायकी अंगातल्या एक एक टप्प्याला घेऊन त्यावरची सादरीकरणं करण्यात आलेली आहेत तर, रंगपंढरी मध्ये नटाला/ दिग्दर्शकाला/लेखकाला त्यांच्या काम करण्याच्या पद्धतीबद्दल प्रश्न विचारल्या गेले आहेत.
आपल्याकडे सगळ्या गोष्टी भरपूर आहेत पण, त्याची सूत्रबद्ध पद्धतीनी नोंदणी (documentation) कुठेही केलेलं आढळत नाही आणि मग काळाच्या ओघात या सगळ्या गोष्टी विस्मरणात जातात.
यातल्या रंगपंढरी कार्यक्रमाचंच उदाहरण घ्या. कार्यक्रमात दोन कलाकारांच्या मुलाखती आहेत जे आज निधन पावले आहेत ते म्हणजे विक्रम गोखले आणि अतुल परचुरे.
दोघांच्याही मुलाखती अतिशय अप्रतिम, खूप शिकवणाऱ्या आणि त्याच बरोबर अतिशय मनोरंजक आहेत. या दोघांचा समृद्ध अनुभव, त्यांची काम करण्याची पद्धत, त्यांची माणसांना निरीक्षण करण्याची पद्धत, बोलताना कोणत्या शब्दावर कसा जोर द्यावा त्यासाठी ते काय करतात याची पद्धत हे सगळं या कार्यक्रमाच्या निमित्ताने नोंदवल्या गेलेलं आहे.
ग्रामीण भागात गायन, नाटक या क्षेत्रात धडपडणारी अनेक मंडळी असतात; त्यांना या दोन कार्यक्रमांच्या रूपाने मुंबई पुण्यातले प्रस्थापित कलाकार कसे काम करतात, चांगलं काम करतात म्हणजे नेमकं काय करतात हे शिकायला देखील या निमित्ताने मिळतंय. हे सगळं आज युट्यूब वर मोफत उपलब्ध आहे हीसुद्धा अतिशय जमेची बाजू आहे.
उत्तम कलाकृतींची चिकित्सा, समीक्षा आणि नोंदणी करावी आणि त्या बरोबरच लोकांचं त्यातून मनोरंजन व्हावं या उद्देशाने हे दोनही कार्यक्रम केल्या गेले त्याबद्दल या दोनही कार्यक्रमांच्या कलाकारांचं, दिग्दर्शकांचं, निर्मात्यांचं हार्दिक अभिनंदन.
मराठी जनमानस यासारख्या कार्यक्रमांतून अधिकाधिक अभिरुचीसंपन्न होत जावो अशी आशा व्यक्त करतो आणि आपल्या लेखणीला विराम देतो.


Comments
Post a Comment