Skip to main content

एक व्यक्ती, तीन विधाने आणि तीन परिणाम

जर एखादी व्यक्ती कठीण परिस्थितीत अत्यंत शांत मनाने आणि शांत डोक्याने परिस्थितीला सामोरी जात असेल आणि कठीण परिस्थितीतून मार्ग काढून यशस्वी होत असेल तर, अशी व्यक्ती लोकांच्या नजरेत भरल्याशिवाय राहत नाही. त्यामुळेच मला अशा व्यक्तीबद्दल लिहिण्याचा मोह देखील आवरत नाही.

आज मी सर्वांना माहिती असलेल्या कथेतल्या मला जाणवलेल्या काही गोष्टी सांगणार आहे.

काही दिवसांपूर्वी नागपूरला एक नागरी सत्काराचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. सत्कारमूर्ती होते नागपूरचेच नेते नितीन गडकरी आणि त्यांचा सत्कार करणारे देखील नागपूरचे दुसरे नेते होते ते म्हणजे देवेंद्र फडणवीस. त्या कार्यक्रमामध्ये देवेंद्र फडणवीस असे म्हणाले, की गडकरी साहेब रोखठोक बोलण्यासाठी प्रसिद्ध आहेत, तर मी अतिशय सांभाळून बोलतो. 

आता, श्री देवेंद्र फडणवीस कसे तोलून मापून बोलतात आणि त्याचे अपेक्षित परिणाम भविष्यात कसे दिसतात याची तीन उदाहरणे मी देणार आहे. ही तीनही विधानं एक सामान्य व्यक्ती म्हणून चटकन माझ्या नजरेत भरली आणि म्हणून ती मी आपल्यासमोर ठेवत आहे. 

पहिला प्रसंग आहे ते विरोधी पक्षनेता असतानाचा. राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी देवेंद्र फडणवीसांवर व्यक्तिगत स्वरूपाचे आरोप केले. ज्याची कुठलीही आवश्यकता नव्हती. या आरोपांना उत्तर देताना फडणवीस म्हणाले की नबाब मलिक यांनी अतिशय फुसके फटाके फोडलेले आहेत. खरे सुतळी बॉम्ब काय असतात हे मी दिवाळीनंतर तुम्हाला दाखवतो. हे विधान ऐकल्यावर सर्वांना असं वाटलं की फडणवीस या आरोपांची राजकीय उत्तरं देतील आणि मोकळे होतील. पण देवेंद्र फडणवीस यांनी नबाब मलिक यांचे अतिरेक्यांशी कसे संबंध आहेत हे खुलासेवार सांगितले आणि या सर्वांचे पुरावे त्यांनी केंद्रीय तपास यंत्रणांना सोपवले. त्याचा परिणाम म्हणून नबाब मलिक यांना अटक झाली. मलिक यांची रवानगी तुरुंगात झाली आणि महाविकास आघाडीचा एक मंत्री गजाआड गेला म्हणून उद्धव ठाकरे यांचे सरकार चांगलेच बदनाम झाले. मलिक यांना प्रदीर्घकाळ तुरुंगात राहावे लागले आणि फडणवीसांनी केलेला सुतळी बॉम्बचा उल्लेख किती गंभीर होता याचीच प्रचिती सर्वांना आली. 

दुसरा प्रसंग काहीसा गमतीदार ही आहे आणि राजकीय उलथापालथ घडवणारा देखील आहे. २०२३ सालचा जुलै महिना होता आणि एकनाथ शिंदे यांच्या सरकारला नुकतेच एक वर्ष पूर्ण झाले होते. सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार नियोजित होता आणि त्यावेळेस फडणवीसांना पत्रकारांनी केंद्रीय मंत्रिमंडळाचा जो विस्तार होणार होता त्याविषयी प्रश्न विचारला. त्याला फडणवीस यांनी अतिशय सूचक उत्तर दिले. ते म्हणाले आम्हाला केंद्राच्या मंत्रिमंडळ विस्तारात फारसा रस नाही आम्हाला राज्याच्या मंत्रिमंडळ विस्तारात रस (interest)आहे. 

खरंतर पंधरा-वीस लोकांचे मंत्रिमंडळ असताना होत असलेल्या मंत्रिमंडळ विस्तारात सरकारच्या प्रमुख पदी बसलेल्या व्यक्तीला किती रस असतो हे सर्वश्रुत आहे. पण तरीही फडणवीस यांचे विधान अनेकांच्या भुवया उंचावून गेले. त्या विधानाची गंभीर दखल कोणालाही घ्यावीशी वाटली नाही किंवा काही गंभीर घडेल असेही कोणाला वाटले नाही. 

दुसऱ्या दिवशी मंत्रिमंडळ विस्ताराच्या कार्यक्रमात अजितदादा पवार हे उपस्थित आहेत हे पाहून अनेक जण विस्मयाचकित झाले आणि त्यांनी लगेच उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली तेव्हा राज्याच्या राजकारणात उलथापालथ झाली आहे हे सर्वांना उमगले. "राज्याच्या मंत्रिमंडळ विस्तारात आम्हाला इंटरेस्ट आहे." हे फडणवीस सहज बोलता बोलता म्हणाले; त्यांचा घोषणेचा सूर नव्हता, ते स्पष्ट भूमिका मांडताहेत असे ही काही नव्हते. ते अगदी सहज अलगदपणे बोलले होते. एखादा माणूस लोकांना गाफील ठेवून पण तरी देखील त्यांना सांगून काय डावपेच करतो आहे याचेच हे विधान म्हणजे उदाहरण होते.

तिसरा प्रसंग आहे २० जून २०२२ रोजीचा. विधान परिषदेच्या निवडणुकीचे निकाल जाहीर झाले होते त्यात भाजपाचे पाचही उमेदवार निवडून आले होते. भाजपाच्या नेतृत्वाने ज्या मेहनतीने आणि हिमतीने ही निवडणूक लढवली होती त्याला खरंच तोड नाही. निवडणूकीचे निकाल जाहीर झाल्यावर पत्रकारांशी बोलताना फडणवीस म्हणाले, "आता महाराष्ट्रात लोकाभिमुख सरकारची स्थापना केल्याशिवाय हा झंझावात थांबणार नाही". हे विधान त्यांनी रात्री उशिरा केले कारण निवडणुकीचे निकाल रात्री उशिरा जाहीर झाले होते. हे विधान त्यांनी केले त्यावेळेस बहुतांश लोक झोपी गेलेले असावेत. दुसऱ्या दिवशी सकाळी बातमी आली की एकनाथ शिंदे हे "नॉट रिचेबल" आहेत. सगळीकडे सर्वत्र हलकल्लोळ सुरू झाला आणि पुढे काय झाले हे सर्वांनाच माहिती आहे. 

महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले तेव्हापासून "लोकाभिमुख सरकार स्थापन करणार" अशा प्रकारचं कुठलंही विधान फडणवीस यांनी कटाक्षाने टाळलं होतं. ते सतत एवढेच बोलत होते की सरकार पाडण्याची आम्हाला कुठलीही घाई नाही आणि महाविकास आघाडीचा सरकार हे त्यांच्यातल्याच अंतर्विरोधानी पडेल. ज्यावेळेस आपलं सरकार स्थापन होईल अशी परिस्थिती त्यांनी निर्माण केली त्यावेळेसच त्यांनी हे विधान केले. 

एखाद्या माणसाच्या व्यक्तिमत्त्वाचा अभ्यास करावा अशा पद्धतीची ही तीन विधानं होती. आपल्याला अनुकूल परिस्थिती निर्माण झाल्याशिवाय कुठलीही विधानं करायची नाहीत आणि अनावश्यक काहीही बोलायचे नाही हाच फडणवीस यांचा स्वभाव यातून दिसतो. आधी काहीतरी बोलायचं आणि मग त्याप्रमाणे काहीच घडत नाही अशाप्रकारे स्वतःच्या व्यक्तिमत्त्वाची गत त्यांनी कुठेही होऊ दिली नाही. कमालीचा संयम, आणि योग्य वेळी योग्य पावले उचलण्याची विवेकबुद्धी या दोन्ही गुणांचे हे द्योतक आहे असेच म्हणावे लागेल. 

आगामी काळात फडणवीस हे आणखी काय विधाने करतात आणि आणखी किती राजकीय मजल मारतात हे बघणे अर्थातच औत्सुक्याचे ठरणार आहे.



Comments

Post a Comment

Popular posts from this blog

नियतीचा क्रूर खेळ आणि रंगलेला कलगीतुरा

राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे बुधवार दि. २८ जानेवारी ला निधन झाले. स्वाभाविकच, राजकीय मतं विसरून लोकांनी या घटनेबाबत हळहळ व्यक्त केली. माध्यमांच्या समोर सतत येणाऱ्या सुप्रिया सुळे, रोहित पवार यांना पाहिले असता अशी शंका येत होती की आता पवार कुटुंबातीलच कोणीतरी म्हणजे मुख्यत्वे सुप्रिया सुळे याच दोन्ही राष्ट्रवादी पक्षांची धुरा सांभाळतील. सुप्रिया सुळे यांच्या राष्ट्रवादी पक्षातल्या काही नेत्यांनी अशी विधानं देखील केली की, दोन्ही पक्ष एकत्र यावेत अशी अजितदादांची इच्छा होती. या सर्व घटनांना आता एक दोन दिवस उलटून गेलेत आणि आता सुनेत्रा पवार या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार अशी बातमी आली.  दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांनी काल रात्री या विषयाच्या संदर्भात एक प्रतिक्रिया दिली. देवेंद्र फडणवीस हे तोलून मापून बोलणारे आहेत त्यामुळे त्यांचं बोलणं नेहमीच लक्षवेधक असतं. ते म्हणाले, महाराष्ट्र सरकार म्हणून आणि भारतीय जनता पक्ष म्हणून आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पूर्णपणे पाठीशी उभे राहू. "राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष" असा स्पष्ट उल्लेख त्यांनी आपल्या बोलण्यात केला. माझी रा...

कधी बहर कधी शिशिर

 डिसेंबर २०२४ मधली घटना आहे. महाराष्ट्राच्या नव्या सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार नागपुरातल्या राजभवनाच्या हिरवळीवर पार पडला होता. पण, या नव्या मंत्रिमंडळात गेल्या वीस वर्षांपासून हमखास असलेले एक नाव मात्र नव्हते.  दुसऱ्या दिवशी या मंत्रिमंडळात वगळल्या गेलेल्या नेत्याने पत्रकारांशी बोलताना तीव्र नाराजी, दुःख आणि आपली खदखद व्यक्त केली. "जहाँ नहीं चैना, वहाॅं नहीं रहना" असं हा नेता बोलला.  आतापर्यंत आपल्या लक्षात आलंच असेल हा नेता कोण. कालांतराने म्हणजेच ५-६ महिन्यानंतर भुजबळ पुन्हा एकदा मंत्री झाले. हे सगळं आता आठवण्याचं कारण म्हणजे अजितदादा पवार यांच्या निधनानंतर घडलेल्या घटना आहेत.  अजितदादांच्या निधनानंतर मुख्यमंत्र्यांना तातडीने जे शिष्टमंडळ भेटलं त्यात भुजबळ देखील होते. प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, धनंजय मुंडे या अजित पवारांच्या मर्जीतल्या शिलेदारांसोबत भुजबळ देखील दिसले. विधिमंडळ गटनेत्याची निवड कधी होईल वगैरे पत्रकारांना माहिती देखील भुजबळांनी दिली.  वर्षभरापूर्वी पक्ष सोडण्याची भाषा करणारे भुजबळ अजितदादांच्या मृत्यूनंतर आघाडीच्या नेत्यांपैकी एक दिसत होते. सत्त...

रमेश प्रभू, खिशातले राजीनामे आणि महिला आरक्षण विधेयक

१६ ते १८ एप्रिल दरम्यान संसदेचे विशेष अधिवेशन बोलवण्यात आले होते, ज्यामध्ये महिला आरक्षण विधेयकाची चर्चा झाली. विधेयक पारित व्हायला दोन तृतीयांश बहुमताची आवश्यकता होती, जे अर्थातच सरकारकडे नसल्यामुळे विधेयक पारित झाले नाही. या सर्व घटनांचा, पूर्वी घडलेल्या घटनांच्या आधारे धांडोळा घेण्याचा मी प्रयत्न करणार आहे. बंगालच्या निवडणुकांपूर्वी मुद्दाम मोदींनी हे विधेयक संसदेत आणले आणि हाणून पडू दिले जेणेकरून बंगालच्या विधानसभा निवडणुकीत त्याचा फायदा त्यांना उचलता येईल असा कयास राजकीय पंडितांकडून वर्तवला जात आहे. एक प्रकारे महिला आरक्षण विधेयकावर मते मिळतात की नाही हे बंगालच्या निवडणुकांमधून भारतीय जनता पक्षाला चाचपून बघायचे आहे असे विश्लेषकांचे मत आहे.  हे घटनाचक्र बघितले असता १९८७ मध्ये झालेल्या विलेपार्ले येथील विधानसभेच्या पोटनिवडणुकीची आठवण येते. या निवडणुकीत सर्वप्रथम बाळासाहेब ठाकरे यांनी "गर्व से कहो हम हिंदू है" अशी घोषणा दिली होती. हिंदुत्वाच्या मुद्द्यावर मते मिळतात की नाही हे बाळासाहेबांना चाचपून बघायचे होते आणि त्यासाठीच त्यांनी विलेपार्ले येथील पोटनिवडणुकीवर त्याचा प्रय...