६ वीत आम्हाला पहिलाच धडा होता "दमडी". हा धडा कुसुमावती देशपांडे यांच्या"मोळी" या कथासंग्रहातून घेतलेला होता. धड्यात नागपूरचे उल्लेख होते. जुन्या काळातली कथा होती त्यामुळे "अजनी", "सोनेगाव" यांची आजूबाजूची गावं अशीच वर्णनं होती. त्यांनी तो धडा इतका जिवंतपणा ओतून शिकवला की काय सांगू.
एकच धडा ३-३, ४-४ दिवस शिकवला जात असे. हा प्रकार मला नवीन होता. कारण, त्या आधीचे शिक्षक, "मराठी शिकवायचं म्हणजे काय असतं त्याच्यात" या रावसाहेबी खाख्याचे होते (रावसाहेब हे पुल देशपांडे यांचे व्यक्तिचित्र आहे).
पण हा नवीन प्रकार मला भलताच भावला. परीक्षेत उत्तरं लिहायची म्हणून मी न शिकलेला कुठला विषय असेल तर तो म्हणजे मराठी. त्यांची पद्धत होती कविता चाल लावून शिकवणं. त्याच्यामुळे तेव्हाच्या कित्येक कविता मला पुर्ण पाठ आहेत. कवितेचा अर्थ समजावून सांगताना एक एक ओळीचा अर्थ उलगडून दाखवत असत. मग, " कड्याकपारी मधुनी घट फुटती दुधाचे" ही बोरकरांची कविता असो, की " माझ्या मराठाची बोलू कौतुके, परी अमृतातेही पैजा जिंके, ऐसी अक्षरे रसिके मेळवीन" असं सांगणारे ज्ञानेश्वर माऊली असोत.
साहित्य म्हणजे सौंदर्य असलेली काहीतरी वस्तू आहे हे कदाचित मला तिथे कळलं असावं.
मला आठवतं, आम्हाला भा रा अर्थात् भास्कर रामचंद्र तांबे (आज त्यांचा मी निस्सीम चाहता झालोय बरं, अर्थात् त्याचं श्रेय हृदयनाथ मंगेशकर यांना आहे. असो) यांची, "मावळत्या दिनकरा अर्घ्य तुज जोडुनी दोन्ही करा" ही कविता होती. मॅडम ला चाल गाऊन दाखवता येत नव्हती. त्या म्हणाल्या उद्या चाल शिकवते. दुसऱ्या दिवशी शाळेत आल्या त्या tape recorder घेऊन. त्याच्यावर लता दीदींच्या आवाजातलं, "मावळत्या दिनकरा" आम्ही ऐकलं आणि मग आम्ही ती कविता त्या चालीवर बसवली. शेजारच्या वर्गातले मास्तर आवाजामुळे काहीसे गोंधळून गेले पण, आम्ही मात्र शिकण्याचा आनंद जो घेतला तोअनमोल आहे. एवढं मन लावून, प्राण ओतून शिकवणारे शिक्षक तरी किती असतात?
माझं काही अफाट वाचन नाही, पण जी काही अभिरुची निर्माण झाली त्याचं श्रेय मात्र माय मराठीला आणि मोरे मॅडम आहे हे नक्की.
- देवाशीष
३० जून २०२३

Comments
Post a Comment