तर, ही आहे एका मधुकर हिरवे नावाच्या आंबटशौकीन माणसाची कथा. चारित्र्यहीन, पत्नीची फसवणूक करणारा वगैरे या विषयाची असणारी गंभीर किनार दिग्दर्शिकेला दाखवायचीच नाही आहे. तिला हा विषय हलका- फुलका, सहज - सोपा परंतु बोध देणारा असा ठेवायचा आहे.
तर, सिनेमाचा नायक आहे डॉ. मधुकर 'हिरवे'. नावाप्रमाणेच आतून हिरवा. लग्न होऊन विसेक वर्ष झालेली आणि एक यशस्वी डॉक्टर म्हणून ख्याती. एके दिवशी याच्या रुग्णालयात शिकावू डॉक्टरची नोकरी मिळवायला एक मुलगी येते (बिना). तिला हा नोकरी देतो आणि तिथून सगळा खेळ सुरू होतो. मग या मुलीला घेऊन कारण काढून फिरायला नेणं, मेडिकल कॉन्फरन्स ला आपल्याबरोबर नेणं, तिला नवनव्या भेटवस्तू देणं हे सर्व उद्योग सुरू होतात, आपली बायको अतिशय अव्यवहारी, बावळट आहे त्यामुळे आपण आयुष्यात एकटे आहोत असे खोटे सांगून डॉक्टर बिनाला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढतो. मग बिना एके दिवशी लग्नाचा विषय काढते तर डॉक्टरांची त्यासाठी तयारी नसते. एक दिवस हा सगळा प्रकार डॉक्टरांच्या पत्नीला म्हणजे सीमाला समजतो आणि ती एक अफलातून कल्पना मांडते. ती डॉक्टरांना म्हणते की तुम्ही बिनाशी लग्न करा, मी तुम्हाला दुसरं लग्न करण्याची परवानगी देते आणि मी सुद्धा इथेच राहीन. मग त्या प्रमाणे त्या दोघांचं लग्न होतं आणि मग पुढे काय गमतीजमती होतात यासाठी तुम्हाला सिनेमाच बघावा लागेल.
या सिनेमाची अतिशय उत्तम बाजू म्हणजे याची पटकथा. शं. ना. नवरे यांच्यासारख्या सिद्धहस्त लेखकानी ती लिहिली आहे त्यामुळे ती लाजवाब आहेच आणि त्याच्या जोडीला स्मिता तळवलकर यांच्या सारखी दिग्दर्शिका त्यामुळे काही बघायलाच नको.
नीना कुळकर्णी (सीमा) म्हणजे डॉक्टरांची पत्नी, मोहन जोशी (डॉ. हिरवे), प्रशांत दामले (डॉ. दिनेश) या तिघा मातबर नटांचे अभिनय आणि त्यांची जमलेली भट्टी अफलातून आहे. याच्या जोडीला अमिता खोपकर आणि रमेश भाटकर मध्येच येऊन धमाल उडवून जातात.
संवादांमधले between the lines, चित्रपटाच्या सुरुवातीला वापरलेल्या संदर्भांमुळे चित्रपटाच्या उत्तरार्धात येणारी मजा, पात्रांना - घराला दिलेली नावं आणि त्याचा सुद्धा कथेतला वापर, प्रत्येक पात्राचा कथेत केलेला significant वापर, आणि एकूणच मांडलेली खुसखुशीत कथा यामुळे हा चित्रपट आजही लोकांच्या स्मरणात आहे. चित्रपटाचं पार्श्वसंगीत आपल्याला खिळवून ठेवतं.
आयुष्यातली एखादी गंभीर घटना डोकं थंड ठेऊन हाताळली तर कशी आटोक्यात आणता येते या गोष्टीची "केस स्टडी" म्हणजे हा चित्रपट आहे. त्यामुळे सीमा (नीना कुळकर्णी) यांची भूमिका खूपच महत्त्वाची आहे. "स्त्रीप्रधान चित्रपट" वगैरे गाजावाजा न करता नायिकेची सशक्त भूमिका असलेला हा चित्रपट आहे.
तात्पर्य काय तर ज्यांनी बघितला असेल तर त्यांनी पुन्हा पुन्हा बघावा (जे लोकं बघतातच) आणि ज्यांनी नाही नक्की बघावा असा हा चित्रपट.
✍🏼 देवाशीष
५ डिसेंबर २०२२

Comments
Post a Comment