मी काही संगीताचा अभ्यासक किंवा विद्यार्थी किंवा जाणकार नाही. मात्र, त्याचा मनसोक्त आस्वाद घेणारा रसिक नक्कीच आहे. त्यामुळे, संगीतातल्या घराण्यांच्या बाबतीत मला जे वाटतं ते लिहितो आहे. जर, काही चुकत असेल तर जाणकारांनी कान धरावा.
एखाद्या घराण्यात गाणं अडकता कामा नये, किंवा घराणं म्हणजे काहीतरी भेदभावाची भावना असते अशा भावना मागच्या काही वर्षात संगीत रसिकांच्या मनात निर्माण झाल्या. याचं कारण म्हणजे जुन्या लोकांच्या शिस्तीचे घेतलेले काही चुकीचे अर्थ.
घराणं म्हणजे approach. एखादं घराणं सुरावर जास्त भर देतं, एखादं तालावर, एखादं शब्दावर सुद्धा थोडा भर देतं, एखाद्या घराण्यात सरगम चा वापर केल्या जात नाही, तानांचे वेगवेगळे प्रकार वगैरे; अशी सगळी ती वैशिष्ट्य आहेत.
प्रत्येक घराण्याचे गुणधर्म त्या घराण्याच्या संस्थापकाच्या प्रतिभेतून, त्याच्या श्रवणसंस्कारातून, त्या भागातल्या संगीत रसिकांच्या आवडी निवडी या प्रमाणे विकसित होत गेल्या. त्यातून घराण्यातल्या गायनाच्या पद्धतीला आकार येत गेला आणि कालांतरानी तिच घराण्याची गायकी म्हणून प्रस्थापित झाली.
पूर्वी एखाद्या घराण्याची गायकी एखादा विद्यार्थी शिकत असेल तर त्यानी दुसऱ्या घराण्याची गायकी ऐकू सुद्धा नये असा नियम बांधून दिला असे. याचे कारण अतिशय लॉजिकल आहे. कारण ज्या पद्धतीचं गाणं तो विद्यार्थी शिकतो आहे त्याच्या पेक्षा वेगळं गाणं त्यानी ऐकलं आणि ते न समजता आपल्या गाण्यात वापरलं तर त्याचं गाणं लोकांवर अपेक्षित परिणाम करू शकणार नाही. एखादा होमिओपॅथी शिकणारा शिकावू डॉक्टर जर मध्ये मध्ये ॲलोपथीच्या वर्गांना जाऊन बसला तर तो कुठलीच पॅथी नीट शिकू शकणार नाही, तेच गाण्याच्या घराण्यांचे आहे. विद्यार्थ्यानी जे शिकतोय ते नीट लक्षपूर्वक आणि निर्दोष शिकावं आणि मग उत्तम गवई झाल्यावर दुसऱ्या घराण्यातल्या चांगल्या गोष्टी घ्याव्यात, असे म्हणूनच पूर्वी सांगत असत. कारण, शिक्षण पुर्ण झालं की कुठली गोष्टी कुठे, कशी वापरायची हे त्या गवयाला कळत असे.
भीमसेन जोशी नेहमी म्हणत असत की कलाकार हा उत्तम चोर असला पाहिजे. एखाद्याच्या गाण्यातल्या चांगल्या गोष्टी घ्यायच्या आणि त्या आपल्या घराण्याच्या नियमात बसवून कशा वापरायच्या हे समजलं पाहिजे असं ते नेहमी म्हणत असत.
दोन घराणी म्हणजे एकमेकांचे शत्रू अशी काहीशी समजूत लोकांमध्ये असते. ती अतिशय चुकीची आहे. दोन भिन्न घराण्याच्या गवयांमध्ये परस्परांविषयी अतिशय आदर, प्रेम आणि शिकण्याची वृत्ती असते. सिनेमात दाखवतात त्या प्रमाणे "सुरों का युद्ध" वगैरे मुळीचच नसतं. कारण, संगीताची साधना केल्यावर अनावश्यक वाद, खालच्या थराची स्पर्धा करण्याचे विचारच त्या माणसाच्या मानत येत नाहीत. म्हणूनच परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा मार्ग म्हणजे संगीत असं म्हंटल्या जातं.
घराण्याच्या पद्धतीमुळे मिळालं काय?
वैविध्य. असं एका शब्दात या प्रश्नाचं उत्तर आहे. माणसं म्हंटली की विचाराच्या पद्धतीत वैविध्य आलं. तोच नियम गाण्याला. त्याच्यामुळे वेगवेगळ्या पद्धतीचं (म्हणजेच वेगवेगळ्या घराण्याचं) गाणं लोकांना ऐकायला मिळायला लागलं. लोक सुद्धा त्याचा आनंद उठवू लागले. एखाद्या घराण्याच्या गाण्यात काही विशिष्ट रस असलेले राग चांगले वाटतात त्यामुळे काही राग एखाद्या घराण्याचं वैशिष्ट्य आहेत असं लोक म्हणू लागले.
तात्पर्य काय घराण्याच्या पद्धतीमुळे वैविध्य जपल्या गेलं आहे. तीन चार घराण्यांची गायकी शिकलेले आणि त्या सर्व नियमांना पाळणारे आणि आपलं गाणं भेसळयुक्त होऊ न देणारे अनेक उत्तम गायक आज आहेत.
पूर्वी जर घराणी नसती तर सगळ्यांचं गाणं सारखंच वाटलं असतं. त्यात एकसुरीपणा आला असता.
आजचं शास्त्रीय गायन क्षेत्र जे आपल्याला दिसतं आहे ते घराण्याच्या माध्यमातूनच आपल्या पर्यंत पोहोचलं आहे. पुढे जाऊन संगीत क्षेत्र जसं जसं काळाप्रमाणे बदलत जाईल त्याप्रमाणे ही घराण्याची पद्धत सुद्धा कदाचित बदलेल.
घराणं या पद्धतीवर अनेक गैरसमज असतात ते दूर करण्याचा हा लहानसा प्रयत्न मी करून पहिला. आवडल्यास नक्की कळवा. न आवडल्यास पण सांगा.
पौष १४, शके १९४४
.jpeg)

Comments
Post a Comment