काही दिवसापूर्वी मी माझी गाडी एका दुकानासमोर लावत होतो. तेव्हा तिथल्या दुकानदारानी मला स्मितहास्य करत सांगितले की , "भैया, प्लीज यहाँ पर गाडी मत लगाओ।". मी "ठीक है" म्हणत लगेच गाडी दुसरीकडे लावली.
आता हेच त्यानी मला उडवाउडवीच्या थाटात सांगितले असतं तर मी पण म्हंटलं असतं की, आता तर मी इथेच गाडी लावतो;
आणि मग संघर्ष उभा राहिला असता.
त्या दुकानदारानी काय केलं?
तर, आपलं इप्सित साध्य करण्याकरता माझा ego जपला. तो त्याच्यापरी बरोबरच होता पण त्यानी ती गोष्ट कशा प्रकारे सांगितली या गोष्टीला महत्त्व आहे.
कॉर्पोरेट कंपन्यांमध्ये ट्रेनिंग देताना सांगितले जाते की, The pitch and the tone of the voice matters most in an effective communication.
कदाचित भारतीय परंपरेमध्ये effective communication चा धडा देण्यासाठीच "तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला" असे म्हणण्याचे प्रयोजन असेल काय?
मोठ- मोठ्या संघटना या यशस्वी होण्या मागे त्यांच्या कार्यकर्त्यांची संवाद साधण्याची हातोटी कारणीभूत आहे. "तू म्हणतोस ते बरोबर आहे, पण मी आता जे सांगितलं तसा तू विचार करून पहा" असं म्हणत एका एका व्यक्तीला आपल्या बाजूला उभं करण्यात ही संवादाची कला खूप उपयोगाची आहे.( पण सत्याचा आधार असला पाहिजे बरं!)
ज्ञानेश्वर महाराजांनी तर, effective communication चा Best possible outcome सांगितला आहे फक्त चार शब्दात, "या हृदयीचे त्या हृदयी"
पण हे "या हृदयीचे त्या हृदयी" साध्य करण्यासाठी मध्ये येणारी जिव्हा आणि त्याचा मन, बुद्धी, विचार यांच्या जोडीनी होणारा उपयोग आणि त्याचा समोरच्यावर होणारा परिणाम याचा विचार आपण "तिळगुळ घ्या गोडगोड बोला" च्या निमित्ताने केला पाहिजे असं वाटतं.
✍️ देवाशीष विनोद सहस्त्रबुध्दे
Comments
Post a Comment