Skip to main content

श्रीयुत गंगाधर टिपरे


कला कुठलीही असो पण तुमच्या आतला चित्रकार हा कायम जिवंत असला पाहिजे.

श्रीयुत गंगाधर टिपरे ही मालिका यूट्यूब वर माझ्या suggested videos मध्ये मला दिसली आणि काही भाग मी पुन्हा अनेक वर्षांनी पाहिले. ते पाहून जे वाटलं ते येथे मांडतो.

सिनेमा असो वा सीरियल; सशक्त कथा किंवा लेखन असलं की ती/ते बघायला वेगळीच मजा येते. दुनियादारी, लुटेरा किंवा काकस्पर्श हे सिनेमे बघितले की हे आपल्याला लक्षात येतं. श्रीयुत गंगाधर टिपरे ही सीरियल फॉर्म मध्ये असलेल्या सशक्त कथेचं उत्तम उदाहरण आहे असं वाटतं.

Episodic मालिका असूनही ती कुठेच cheap होत नाही, रटाळ होत नाही, typical ही होत नाही आणि शेवटी सकारात्मक संदेश ही देऊन जाते. समाजाचं स्वास्थ्य उत्तम राहण्यासाठी कुठल्याही कलाकृती नी सकारात्मक च संदेश द्यायला हवा. तो इथे अतिशय उत्तम प्रकारे दिल्या गेलेला आहे असे वाटते. ही मालिका दिलीप प्रभावळकरांच्या "अनुदिनी" या पुस्तकावरून तयार केली असल्या मुळे दैनंदिन जीवनाच्या अवतीभवतीच संपूर्ण कथा फिरते. भागाच्या सुरुवातीला भागाच्या विषयाचा अंदाज येत नाही पण साधारण १० व्या मिनिटाला अंदाज येतो आणि मग भाग पुढे जातो. उदाहरणार्थ एक दिवस शिऱ्या ला स्वप्नं पडतं की तो धर्मेंद्र चा जावई झालाय. मग तो आबांना हे स्वप्न सांगतो. आबा त्यावर पहाटे पडणारी स्वप्न खरी होतात त्यामुळे आता धर्मेंद्र चा जावई व्हायचं असेल तर तू चांगला व्यायाम वगैरे कर असा सल्ला देतात. शेखर सकाळी कार्यालयात जायच्या तयारीत असताना ही सर्व चर्चा ऐकतो. कार्यालयात सुद्धा या विषयाची चर्चा होते. रोजच्या रहाटगाडग्यात स्वप्नांचीच चैन मध्यमवर्गीय माणसाला परवडू शकते असा सर्वजण त्यातून निष्कर्ष ही काढतात. रात्री पुन्हा शेखर श्यामलाला "तुला स्वप्न पडतात का गं?" असं विचारतो. त्यावर श्यामला, "मी दिवसभर दमलेली असते, त्यामुळे पाठ टेकल्या बरोबर मला झोप लागते. स्वप्न- बिप्न मला काही पडत नाहीत" असं सांगते. त्यावर शेवटी शेखर "ठीक आहे श्यामलाबाई, आजचा दिवस संपला. आता मस्त स्वप्न बघत मी झोपतो" असं म्हणून झोपतो.

शेवटचं श्यामलाचं वाक्य सर्व काही सांगून जातं, "मला का पडेल स्वप्न. स्वप्नात सुद्धा मिळणार नाही इतका सुंदर संसार मला मिळाला आहे." आणि भाग संपतो. पु. लंच्या लेखनामध्ये जसा शेवटच्या वाक्यात undercurrent असायचा त्या धाटणीचं सादरीकरण या मालिकेत सुद्धा दिसतं.

१८-१९ वर्षाच्या मुलांच्या बापाची, म्हाताऱ्या वडलांची काळजी वाहणाऱ्या मुलाची, नवऱ्याची आणि या सर्व कुटुंबाची जबाबदारी असलेल्या माणसाची भूमिका राजन भिसे यांनी ज्या प्रकारे केली आहे त्याला तोड नाही. त्यांच्या चेहऱ्यावर वरती दिसणारी चिंता, राग, आनंद, विवंचना साऱ्याच उत्तम. दिलीप प्रभावळकर यांचं सरावलेलं comic timing बद्दल आपण काय बोलणार. नातू आणि आजोबा यांचं bonding पण उत्तम दाखवलं आहे. शुभांगी गोखले श्यामलाच्या भूमिकेत अभिनय करतात आहेत असं वाटतच नाही. रेश्मा नाईक आणि विकास कदम अनुक्रमे शलाका आणि शिऱ्या च्या भूमिकेत उत्तमच आहेत.

ललित वाङ्मयाचं अतिशय उत्तम चित्रण असं मालिकेचं एका वाक्यात वर्णन करता येईल.

अभिनेत्या बरोबरच लेखक म्हणून दिलीप प्रभावळकर किती great आहेत हे आपल्याला दिसतं. पटकथा, दिग्दर्शन आणि निर्माता म्हणून केदार शिंदे नी धुरा सांभाळली आहे. पुढच्या काळात प्रचंड यशस्वी झालेले गुरु ठाकूर आणि अजय अतुल यांनी अनुक्रमे संवाद आणि पार्श्वसंगीत याची धुरा सांभाळली आहे.

एकूणच काय हसवणारी, अनेक प्रश्नांवर भाष्य करणारी, आनंद देणारी आणि चटकन डोळ्यांच्या कडा ओल्या करणारी "श्रीयुत गंगाधर टिपरे" ही मालिका बघायलाच हवी.

✍️ देवाशीष विनोद सहस्त्रबुध्दे
०९.०८.२०१९

Comments

Popular posts from this blog

नियतीचा क्रूर खेळ आणि रंगलेला कलगीतुरा

राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे बुधवार दि. २८ जानेवारी ला निधन झाले. स्वाभाविकच, राजकीय मतं विसरून लोकांनी या घटनेबाबत हळहळ व्यक्त केली. माध्यमांच्या समोर सतत येणाऱ्या सुप्रिया सुळे, रोहित पवार यांना पाहिले असता अशी शंका येत होती की आता पवार कुटुंबातीलच कोणीतरी म्हणजे मुख्यत्वे सुप्रिया सुळे याच दोन्ही राष्ट्रवादी पक्षांची धुरा सांभाळतील. सुप्रिया सुळे यांच्या राष्ट्रवादी पक्षातल्या काही नेत्यांनी अशी विधानं देखील केली की, दोन्ही पक्ष एकत्र यावेत अशी अजितदादांची इच्छा होती. या सर्व घटनांना आता एक दोन दिवस उलटून गेलेत आणि आता सुनेत्रा पवार या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार अशी बातमी आली.  दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांनी काल रात्री या विषयाच्या संदर्भात एक प्रतिक्रिया दिली. देवेंद्र फडणवीस हे तोलून मापून बोलणारे आहेत त्यामुळे त्यांचं बोलणं नेहमीच लक्षवेधक असतं. ते म्हणाले, महाराष्ट्र सरकार म्हणून आणि भारतीय जनता पक्ष म्हणून आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पूर्णपणे पाठीशी उभे राहू. "राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष" असा स्पष्ट उल्लेख त्यांनी आपल्या बोलण्यात केला. माझी रा...

कधी बहर कधी शिशिर

 डिसेंबर २०२४ मधली घटना आहे. महाराष्ट्राच्या नव्या सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार नागपुरातल्या राजभवनाच्या हिरवळीवर पार पडला होता. पण, या नव्या मंत्रिमंडळात गेल्या वीस वर्षांपासून हमखास असलेले एक नाव मात्र नव्हते.  दुसऱ्या दिवशी या मंत्रिमंडळात वगळल्या गेलेल्या नेत्याने पत्रकारांशी बोलताना तीव्र नाराजी, दुःख आणि आपली खदखद व्यक्त केली. "जहाँ नहीं चैना, वहाॅं नहीं रहना" असं हा नेता बोलला.  आतापर्यंत आपल्या लक्षात आलंच असेल हा नेता कोण. कालांतराने म्हणजेच ५-६ महिन्यानंतर भुजबळ पुन्हा एकदा मंत्री झाले. हे सगळं आता आठवण्याचं कारण म्हणजे अजितदादा पवार यांच्या निधनानंतर घडलेल्या घटना आहेत.  अजितदादांच्या निधनानंतर मुख्यमंत्र्यांना तातडीने जे शिष्टमंडळ भेटलं त्यात भुजबळ देखील होते. प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, धनंजय मुंडे या अजित पवारांच्या मर्जीतल्या शिलेदारांसोबत भुजबळ देखील दिसले. विधिमंडळ गटनेत्याची निवड कधी होईल वगैरे पत्रकारांना माहिती देखील भुजबळांनी दिली.  वर्षभरापूर्वी पक्ष सोडण्याची भाषा करणारे भुजबळ अजितदादांच्या मृत्यूनंतर आघाडीच्या नेत्यांपैकी एक दिसत होते. सत्त...

रमेश प्रभू, खिशातले राजीनामे आणि महिला आरक्षण विधेयक

१६ ते १८ एप्रिल दरम्यान संसदेचे विशेष अधिवेशन बोलवण्यात आले होते, ज्यामध्ये महिला आरक्षण विधेयकाची चर्चा झाली. विधेयक पारित व्हायला दोन तृतीयांश बहुमताची आवश्यकता होती, जे अर्थातच सरकारकडे नसल्यामुळे विधेयक पारित झाले नाही. या सर्व घटनांचा, पूर्वी घडलेल्या घटनांच्या आधारे धांडोळा घेण्याचा मी प्रयत्न करणार आहे. बंगालच्या निवडणुकांपूर्वी मुद्दाम मोदींनी हे विधेयक संसदेत आणले आणि हाणून पडू दिले जेणेकरून बंगालच्या विधानसभा निवडणुकीत त्याचा फायदा त्यांना उचलता येईल असा कयास राजकीय पंडितांकडून वर्तवला जात आहे. एक प्रकारे महिला आरक्षण विधेयकावर मते मिळतात की नाही हे बंगालच्या निवडणुकांमधून भारतीय जनता पक्षाला चाचपून बघायचे आहे असे विश्लेषकांचे मत आहे.  हे घटनाचक्र बघितले असता १९८७ मध्ये झालेल्या विलेपार्ले येथील विधानसभेच्या पोटनिवडणुकीची आठवण येते. या निवडणुकीत सर्वप्रथम बाळासाहेब ठाकरे यांनी "गर्व से कहो हम हिंदू है" अशी घोषणा दिली होती. हिंदुत्वाच्या मुद्द्यावर मते मिळतात की नाही हे बाळासाहेबांना चाचपून बघायचे होते आणि त्यासाठीच त्यांनी विलेपार्ले येथील पोटनिवडणुकीवर त्याचा प्रय...