नागपूर. देशाचा मध्यबिंदू. या मध्यबिंदू शब्दातच नागपूरचं सगळं वर्णन येतं. पूर्व - पश्चिम - उत्तर - दक्षिण या चारही भागातली संस्कृती आपलीशी करून त्याच्या आधारे स्वतःची संस्कृती निर्माण करणारं शहर म्हणजे नागपूर. त्यामुळे शासकीय दृष्ट्या जरी महाराष्ट्रातील शहर असले तरी अन्य महाराष्ट्रीय शहरांचे गुणधर्म नागपुरात सापडत नाहीत. (या गोष्टीचं नागपूरकरांना काहीही सोयरसुतक नाही; त्यामुळे इतरांनी अनावश्यक कंठशोष करू नये; त्याचा काहीही उपयोग होणार नाही. कृपया हे वाक्य हलक्यात घ्यावं).
जेमतेम तासभर दुचाकीवर प्रवास केलात तर मध्यप्रदेश सुरु होतो. २-४ तास प्रवास केला तर छत्तीसगढ सुरु होतो. १५० कि.मि वर असलेल्या चंद्रपूरात तेलगू भाषेतल्या पाट्या सुद्धा दिसतात (तेलंगणा जवळ असल्यामुळे). पश्चिमेकडे मराठी बहुल भाग आहे. त्यामुळे नागपूर हे बहुसांस्कृतिक शहर आहे. त्याच्यावर एका कुठल्या संस्कृतीचा शिक्का कोणी मारू शकत नाही.
नागपुरात जसे मराठी भाषिक लोक राहतात तसे सिंधी, मारवाडी, मध्य प्रदेश, छत्तीसगडातले लोकही भरपूर प्रमाणात राहतात. नागपूरकर मंडळींना भाषा ही अस्मितेपेक्षा संवादाचे साधन अधिक वाटते त्यामुळे मी मराठी आहे यात अभिमान बाळगण्यासारखे काय आहे ही नागपूरकरांची भावना आहे. जशी माझी भाषा मराठी तशीच दुसऱ्याची हिंदी त्यामुळे समोरच्या माणसाला मराठी येत नसेल तर इथली मंडळी अट्टाहासानी मराठी बोलताना अजिबात दिसत नाहीत. सरळ हिंदीत बोलतात. त्यामुळे इथे तुम्हाला "हिंदी बोलणारा आणि मराठी संगीतनाटक आवडणारा" रसिक नक्कीच दिसेल.
एकदा बंगलोर मधल्या मराठी भाषिक लोकांना एका मराठी वृत्तवाहिनीचा प्रतिनिधी काही प्रश्न विचारत होता. त्या लोकांत एक मुलगी नागपूरची होती. ती म्हणाली, "नागपूरला पूर्ण भारत दिसतो. चारही दिशांच्या संस्कृती दिसतात." या एका वाक्यातच नागपूरची खुबी आहे. नागपूरचा स्वभाव "महाराष्ट्रातील एक शहर" असा नसून भारतातील एक शहर असा आहे.
दुकानदाराशी हिंदीत बोलल्यामुळे किंवा आवश्यक तिथे हिंदी बोलल्यामुळे "मराठी संस्कृतीचा ह्रास" होईल या सर्व कल्पना इथे अत्यंत भंपक समजल्या जातात.
इथल्या राजकारणावर सुद्धा वरील सर्व गोष्टींचा परिणाम आपल्याला दिसतो. "परप्रांतीय" वगैरे शब्द वापरून राजकारण करणारे इकडच्या लोकांच्या वाऱ्यालाही उभे राहिले नाहीत.इथे शिवसेना, राष्ट्रवादी, मनसे वगैरे प्रादेशिक पक्षांची काहीही चालत नाही. पार्ट्या दोनच भाजपा आणि काँग्रेस.
पश्चिम महाराष्ट्रातल्या लोकांना या सर्व गोष्टी पचवायला जड जातात. नागपूरला अमुक बाब अशीच का? असा त्यांना प्रश्न पडतो म्हणून हा लेखन प्रपंच. नागपूर समजून घ्यायचे तर इकडे येऊन बघावे लागेल (एकदा आमच्या नागपूरला येऊन जा ना - संत्र्याच्या season ला. मस्त वाळ्याचे तट्टे गिट्टे लावून पडून राहू आरामात😀)आणि आपले भाषिक - प्रादेशिक पूर्वसंस्कार बाजूला ठेवून बघावं लागेल. त्याला सातारा - सांगली - कोल्हापूर च्या फूटपट्ट्या लावून काहीही उपयोग होणार नाही, कारण त्या फूटपट्टी चे measurements इथे correct results देणार नाहीत.
✍️देवाशीष विनोद सहस्रबुद्धे


Mazya sobat ch hazaro nagpurkarancha vichar correct mandala aahe mitra!!
ReplyDelete